Wednesday, December 18, 2013

ज्ञान आणि मोक्ष | Knowledge and Liberation


 

अज्ञानामुळे मन कल्पित सुखदुःखांचा संसार निर्माण करून त्यात अडकते आणि पुन्हा ते स्वस्वरूपाकडे जाण्याची धडपड करते.  हा जीवाचा संसार अज्ञान-निर्मित असल्यामुळे संसार-निवृत्ति म्हणजेच अज्ञान-निवृत्ति होय – म्हणजेच ज्ञानप्राप्ति म्हणजेच मोक्षप्राप्ति होय.

मनानेच अज्ञानाने कल्पना करून स्वतःला मर्यादा घालून घेतल्या आहेत. या सर्व मर्यादा मानसिकच आहेत.  म्हणून मी बद्ध आहे, मर्त्य आहे, सुखी-दुःखी आहे.  या सर्व कल्पनाच आहेत.  वास्तवात ही बंधने नाहीतच. म्हणून या अज्ञानकल्पित बंधनांच्यामधून सुटणे म्हणजेच मोक्ष होय.  अज्ञानकल्पना संपली की, सर्व सुखदुःख, पापपुण्य, जन्ममरण हे सर्व संपलेच असे समजावे.  मरण कल्पनेशी थांबे अर्थ जाण त्याचा |

श्रुति म्हणते – मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः |
विषयासक्त अज्ञानी मन बंधनाला, संसाराला कारण होते व निर्विषय मन मोक्षाला साधनीभूत होते.  अज्ञान हे मोक्षप्राप्तीतील अडसर तर ज्ञान हेच मोक्षाचे साधन आहे, कारण ज्ञान हेच अज्ञानाच्या विरोधी असल्यामुळे ज्ञानानेच अज्ञानाचा नाश होतो.

ज्याप्रमाणे – पाकस्य वन्हिवत् ज्ञानं विना मोक्षो न सिध्यति |
धान्य, भाजी, भांडी, मसाले – सर्व असूनही अग्नीशिवाय पाकसिद्धि होत नाही.  पाकसिध्दीसाठी अग्नि हेच प्रमुख साधन आहे.  त्याचप्रमाणे साधक अनेक प्रकारची साधना करीत असला, कर्म, योग, भक्ति, सेवा, अनेक प्रकारचे तप इ., तरी ज्ञानाशिवाय मोक्षप्राप्ति नाही.  म्हणून शास्त्रामध्ये जरी अनेक प्रकारच्या साधना दिल्या तरी मुख्य जर साधना असेल तर फक्त ज्ञानसाधना आहे.  

भगवान म्हणतात – न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते |
या विश्वामध्ये ज्ञानासारखी पवित्र वस्तू नाही.  

 

- "साधना आणि साध्य" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून,  सप्तम आवृत्ति, २०१०    
- Reference:  "Sadhana Ani Sadhya" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 7th Edition, 2010



- हरी ॐ

No comments:

Post a Comment