Tuesday, July 9, 2013

अंतरंगाची मशागत | Nurturing our Mind







भगवंतानी अर्जुनाला आत्मस्वरूपाचे ज्ञान श्रीमद्भगवतगीतेच्या अठरा अध्यायांच्यामधून प्रतिपादित केलेले आहे.  हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी अंत:कारण हे साधन आहे आणि जेथे ज्ञान प्राप्त होते ते ज्ञानाचे स्थानही अंत:करणच आहे.  त्यामुळे जीवनाचे अत्यंत गूढ, श्रेष्ठ, सूक्ष्म ज्ञान प्राप्त करण्यासाठी अंत:करणाची तयारी होणे अत्यंत आवश्यक आहे.
 
निरतिशय आनंद अनुभवण्यासाठी आपले मन सापेक्षतेने तरी आनंदी, शांत, प्रसन्न असले पाहिजे.  यासाठी शास्त्रकार सुंदर दृष्टान्त देतात.  जमिनीमध्ये एखादे बी पेरावयाचे असेल तर आपण काय करतो ?  बी घेऊन लगेचच पेरत नाही.  तर जमिनीची योग्य प्रकारे उत्तम मशागत करतो.  प्रथम जमिनीवरील मोठमोठे दगड, छोटे दगड, अनावश्यक वाढलेले गवत काढून टाकतो.  नंतर जमीन नांगरून तिच्यामध्ये बी पेरतो.  त्याला कुंपण घालतो.  योग्य प्रमाणात खतपाणी घालून त्या बीजाची सर्वतोपरी निगा राखतो.  त्यानंतरच योग्य काळामध्ये त्या सुपीक जमिनीमधून आपल्याला त्या बीजापासून भरघोस पिक मिळते.
 
त्याचप्रमाणे आपल्या अंत:करणामध्ये या गुह्य ज्ञानाचे बी पेरायचे असल्यास प्रथम अंत:करणाची मशागत केली पाहिजे.  आज आपले मन अशुद्ध आहे, कारण अनके जन्मांचे आपल्या मनावर चांगले-वाईट संस्कार झालेले आहेत.  आपण आपल्या पुरुषार्थाने सतत रागद्वेषांचे, कामक्रोधादि विकारांचे पोषण करीत असतो.  ही सर्व अशुद्धता नाहीशी करण्यासाठीच सर्व साधना आहे. ज्ञानप्राप्तीला वेळ लागत नाही.  पूर्वतयारीसाठीच जन्मानुजन्मे लागतात.
 
श्रुति म्हणते – मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयो: | (अमृतबिन्दुउपनिषद् )

मन हेच मनुष्याच्या बंधनाला किवा मोक्षाला कारण आहे.  म्हणून सर्व उपदेश मनालाच आहे. मनाला उद्देशुनच सर्व साधना आहेत.
 
 

- "दिव्यत्वाचा मार्ग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ती, २०१०
- Reference: "Divyatwacha Marg" by P.P. Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, 2010




- हरी ॐ

 
 
 
 




 

No comments:

Post a Comment