Tuesday, July 2, 2013

उत्तिष्ठत जाग्रत ! | Arise and Awake !




जसे लहान मूल पहिल्यांदाच चालायला लागल्यावर खाली पडते, खाली पडल्यानंतर पुन्हा उठते, उभे राहायला शिकते, पहिले पाउल टाकते, पुन्हा पडते. त्याचा हात सोडला तर ते मूल स्वतःच उठण्यासाठी संघर्ष करते, प्रयत्न करते. त्याप्रमाणेच आपल्या जीवनामध्येही संघर्ष आहे. स्वतःच स्वतःच्या साहाय्याने उभे राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी प्रथम आमची आमच्या जीवनावर श्रद्धा पाहिजे. दुर्दम्य आत्मविश्वास, प्रचंड मोठे धैर्य व जिद्द आवश्यक आहे. त्यामधूनच जीवनाचा अंतरंग विकास होत असतो. तोच मनुष्याचा पुरुषार्थ आहे.

भगवान हजारो वर्षांच्यापूर्वी अर्जुनाला जीवनाचे हेच रहस्य सांगतात. गीता मनुष्याला कधीही निषक्रीय बनवीत नाही. उलट जो मनुष्य जीवनाला घाबरतो, भ्याडपणे पळून जातो, आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो, अशा निराश, उद्विग्न व दु:खी मनुष्याला भगवान गीतेमधून जीवन जगण्याची सुंदर दृष्टि प्रदान करतात. जीवन खूप सुंदर आहे, ते अधिक सुंदर कसे जगावे? यासाठी बहिरंगाने जीवन बदलण्यापेक्षा जीवनाकडे पाहण्याची अंतरंग दृष्टी बदलणे आवश्यक आहे. वेदही मनुष्याला हाच आदेश देतात –

            उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत  (कठ. उप. १-३-१४)

“Arise and Awake!”  अज्ञानामध्ये गाढ निद्रिस्त झालेल्या हे जीवांनो ! उठा ! जागे व्हा ! निश्चित ध्येयांना प्रेरित होऊन श्रेष्ट आचार्यांना शरण जा. दुर्दैवाने हा मनुष्य फक्त इंद्रियभोगांना  महत्व देऊन वैषयिक जीवन जगतो. त्याच्या जीवनाचे “खाओ, पिओ, मजा करो !”  हेच सूत्र झालेले आहे. परंतु या भोगमय, पशुतुल्य, स्वैर, कामुक जीवनापेक्षा सुद्धा एक उत्कृष्ठ असे असणारे वेगळे जीवन आहे, याची जाणीव मनुष्याला झाली पाहिजे. त्याच वेळी त्याच्या जीवनाचा विकास होण्यास हळुहळू प्रारंभ होईल.


 

"व्यक्तिमत्त्व विकास" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ती,  जुलै २००७
- Reference: "Vyaktimattwa Vikas (Personality Development)" by P.P. Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, July 2007
                                    
- हरी ॐ


 

No comments:

Post a Comment