Sunday, March 3, 2013

विषयदोषदर्शन (Demerits of worldly objects)

साधक आयुष्यात ज्या विषयांना सत्यत्व देतो, त्यांनाच महत्त्व देतो. त्यांच्याविषयी आभिमान निर्माण होतो. परंतु हे सगळे सत्य भासणारे विषय क्षणिक, क्षणभंगुर, नाशवान आहेत. ते सर्व विषय दुःखालाच कारण आहेत.

विषयांचा काही प्रमाणात उपयोग आहेच. फक्त विषयांना फाजील महत्त्व देऊ नये. यासाठीच विषयदोषदर्शनाची आवश्यकता आहे. विषयांच्यामध्ये प्रामुख्याने चार दोष आहेत –

१.       अनित्यत्वं – प्रत्येक विषय हा काळामध्ये निर्माण झालेला असल्यामुळे त्याचा एक न एक दिवस नाश हा निश्चित आहे. या विश्वामध्ये एकही विषय शाश्वत, नित्य, चिरंतन नाही, कारण यत् कृतकं तत् अनित्यम् इति|

२.       दुःखित्वंअनित्य, नाशवान असल्यामुळेच प्रत्येक विषय हा दुःखालाच कारण आहे. प्रत्येक विषय, उपभोग मनुष्याला अतृप्त, असमाधानी ठेऊन दुःखी करतो.

३.       बद्धत्वंविषय पाहिला की मनामध्ये त्याविषयी आकर्षण, स्नेह, प्रीति, संग निर्माण होऊन मनुष्य विषयाच्याशिवाय जगू शकत नाही. तो विषयांच्या पूर्णपणे आहारी जाऊन विषयांचा गुलाम होतो. ‘विषय मिळाले तर मी सुखी, विषय मिळाले नाहीत तर मी दुःखी होतो’. याप्रकारे मनुष्य सर्वस्वी विषयांवर अवलंबून राहातो. विषयपाशामध्ये पूर्णपणे बद्ध होतो.

४.       मिथ्यात्वंविषयांचा शेवटचा दोष म्हणजे ‘मिथ्यात्वम्’. सर्व विषय मृगजळाप्रमाणे मिथ्या, भासमान, अनित्य स्वरूपाचे आहेत.

या सर्वांचा साधकाने पुन्हा पुन्हा विचार करावा. साधकाने कर्मजन्य असणाऱ्या सर्व विषयांचे परीक्षण करून या अनित्य विषयांच्यापासून, कामनांच्यामधून, विषयासक्तीमधून मन निवृत्त करून अंतर्मुख करावे. अनित्याचा त्याग करून नित्य वस्तूचाच आश्रय घ्यावा.




- "दिव्यत्वाचा मार्ग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्ताकामधून, प्रथम आवृत्ती,  २००१
- Reference: "Divyatwacha Marg" by P.P. Swami Swaroopanand  Saraswati, 1st Edition, 2001

                                                                               - हरी ॐ

No comments:

Post a Comment