Tuesday, February 19, 2013

मनुष्याचे खरे कर्तव्य (The true duty of Man)

           मनुष्याणां सहस्त्रेषु कश्चिद्यतति सिद्धये |
                      यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः || (गीता अ. ७-३ )

हजारो-लाखो मनुष्यांच्यामध्ये एखादाच आत्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो.  यानंतर मनुष्यत्व, मुमुक्षुत्व प्राप्त झाले तरी आपली जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी, आपल्या जीवनाला योग्य दिशा देऊन मार्गदर्शन करण्यासाठी श्रेष्ठ अशा गुरूंची, म्हणजेच आचार्यांची आवश्यकता आहे.  ही  अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे.

ज्या जीवाला मनुष्यत्व, मुमुक्षुत्व व श्रेष्ठ आचार्यांची प्राप्ति झालेली आहे, तोच या विश्वामध्ये अत्यंत भाग्यवान, धन्य पुरुष आहे. या तीन्हीही दुर्मिळ गोष्टी प्राप्त झाल्यानंतर त्याचे एकच कर्तव्य आहे. ते म्हणजे – आत्मकल्याणं एव कर्तव्यम् | कर्तव्य म्हणजेच जे करणे योग्य आहे ते केलेच पाहिजे, ते कर्तव्य होय.

व्यवहारामध्ये कर्तव्य या शब्दाचा अर्थ खूप संकुचित केला जातो. व्यावहारिक कर्तव्यांनाच आपण जीवनाचे इतिकर्तव्य मानतो. शाश्त्रामध्ये प्रत्येक मनुष्यास धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे चार पुरुषार्थ दिलेले आहेत. त्यापैकी अर्थ व काम हे पुरुषार्थ सहजस्वाभाविक आहेत. पशूंच्यामध्ये हे दोनच पुरुषार्थ दिसतात. परंतु मनुष्याला विवेकशक्ति दिल्यामुळे अर्थ आणि कामाबरोबरच मनुष्याने धर्म व मोक्ष हेही पुरुषार्थ पूर्ण केले पाहिजेत. म्हणून धर्म व मोक्ष यांच्यामध्ये अर्थ व काम हे पुरुषार्थ सांगितलेले आहेत. जर मनुष्य अर्थकामनेच प्रेरित होऊन जीवन जगत असेल तर त्याच्यामध्ये व पशूमध्ये काहीच फरक राहाणार नाही.

यामुळे मनुष्याचे खरे कर्तव्य असेल तर ते म्हणजेच स्वतःचे कल्याण करून घेणे. या कर्तव्यामध्ये कधीही तडजोड करता येत नाही.


- "दिव्यत्वाचा मार्ग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्ताकामधून, प्रथम आवृत्ती,  २००१
- Reference: "Divyatwacha Marg" by P.P. Swami Swaroopanand  Saraswati, 1st Edition, 2001



- हरी ॐ

1 comment: