वसिष्ठ मुनींनी मोक्षप्राप्तीमध्ये
विचारमार्गाचा आग्रह धरला आहे. मोक्षप्राप्तीमध्ये
अन्य सर्व साधना किंवा मार्ग हे चित्ताच्या शुद्धीसाठी सांगितले आहेत. परंतु विचारमार्गाने मात्र प्रत्यक्ष निर्वाण पदापर्यंत
पोहचता येते. विचारांच्यामध्ये
प्रचंड मोठे सामर्थ्य आहे. म्हणून या संपूर्ण ग्रंथामध्ये ३२००० श्लोकांच्यामधून वसिष्ठ
मुनि मनुष्याला अनेक प्रकारे व अनेक पद्धतीने विचारप्रवृत्त करतात आणि सांगतात की,
मोक्षप्राप्तीमध्ये या ज्ञानाशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही.
जो या शास्त्राचा घनाभ्यास करेल त्याला अपूर्व
पांडित्य प्राप्त होईल. म्हणून एखादे पुस्तक
किंवा मासिक वाचल्याप्रमाणे हे शास्त्र, उपनिषदे किंवा योगवासिष्ठ ग्रंथ हे केवळ पुन्हा
पुन्हा वाचणे म्हणजे अभ्यास नव्हे. काही वेळेला
साधक शालेय पाठयपुस्तकाप्रमाणे उपनिषदे वाचतात. त्यावरून टिपणे काढतात आणि आत्मानुभूतीची अपेक्षा
करतात. वसिष्ठ मुनि या सगळ्या पद्धतींचे
येथे खंडन करतात आणि सांगतात की, साधकाने एकांतवासामध्ये जाऊन या शास्त्राचा घनाभ्यास
करावा. म्हणजे जे मी ऐकले त्याचे मनाने पुन्हा
पुन्हा चिंतन करावे. शास्त्रचिंतनासाठी एकांतवास
आवश्यक आहे. कारण एकांतवासामध्येच चिंतनासाठी
आपले मन उपलब्ध होते.
याप्रमाणे जो साधक अखंडपणे अंतर्मुख होऊन शास्त्रचिंतन
करेल त्याला अपूर्व असे पांडित्य प्राप्त होईल. येथे पांडित्य म्हणजे शाब्दिक विद्वत्ता किंवा वक्तृत्व
नव्हे. आदि शंकराचार्य 'पंडित' या शब्दाची
व्याख्या करतात - पण्डा आत्मविषया बुद्धिः येषां ते | ज्याच्यामध्ये आत्मबुद्धि, आत्मज्ञान उदयाला
येते, त्यांना 'पंडित' असे म्हणतात. या ग्रंथाच्या
श्रवणाने असे अपूर्व पांडित्य उदयाला येऊन साधकाच्या मनावर ज्ञानाचे उत्तम संस्कार
होतात.
- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९
- Reference: "Yogavashishtha" by Param
Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019
- हरी ॐ–

