विश्व सर्व प्राणिमात्रांना त्यांच्या
त्यांच्या कर्मांची फळे भोगण्याचे स्थान आहे. जो जसे कर्म करतो, तसेच त्याला फळ मिळते. त्यामुळे कोणाला, कोणत्या कर्माचे, कोणते फळ द्यावयाचे, हे सर्वकाही जाणणारा कोणीतरी सर्वज्ञ असलाच पाहिजे, कारण
अल्पज्ञ जीवाला कोणत्या कर्माचे कोणते फळ मिळते, हे समजण्याचे सामर्थ्य नाही. त्यामुळे ईश्वर हाच सर्वज्ञ
असल्यामुळे तोच कर्माध्यक्ष व कर्मफळदाता असून त्यानेच ही सृष्टि निर्माण केलेली
आहे, हे सिद्ध होते. ही सृष्टि
ईश्वराने अत्यंत विचारपूर्वक, प्रयत्नपूर्वक व नियोजनबद्ध रीतीने केलेली आहे. विश्वाच्या नियमात, कर्म-कर्मफळाच्या नियमामध्ये
कोठेही गोंधळ दिसत नाही. एकाने कर्म
केले व दुसऱ्यालाच फळ मिळाले, असे कधीही होत नाही.
व्यवहारामध्ये आपल्या सर्व यंत्रणा कोलमडून
पडतात. आधुनिक तंत्रज्ञान कितीही प्रगत
झाले असेल तरी आपली यंत्रे बिघडतात. आपल्या
संगणकामध्ये व्हायरस जातात. काही वेळेस
मेमरी कमी पडते, काही वेळेस हार्डवेअर तर काही वेळेस सॉफ्टवेअर खराब होते. परंतु ईश्वराची यंत्रणा इतकी अद्भुत आहे की,
त्यामध्ये अनादि काळापासून असंख्य जीवांची माहिती असते. कोणी, केव्हा, कोणते कर्म केले, कोठे, कसे,
कशासाठी केले ? त्याला फळ केव्हा, कोठे,
कसे, किती मिळणार, या सर्वांच्यावर ईश्वराचे नियमन आहे. म्हणूनच तो कर्माध्यक्ष व कर्मफलदाता आहे. भगवान रमणमहर्षि म्हणतात – कर्तुराज्ञया प्राप्यते फलम् | (उपदेश सारम्)
विश्वकर्त्या ईश्वराच्या आज्ञेने जीवाला
कर्माची फळे प्राप्त होतात. ईश्वराशिवाय
अन्य कोणत्याही परिच्छिन्न बुद्धीला हे सर्व करणे शक्य नाही. म्हणून विश्वाची निर्मिती ही विनाकारण झालेली
नाही. विश्व हे अचानक झालेला अपघात, किंवा
केवळ अणुरेणूंचा स्फोट नाही. विश्व हे accidental
नाही. तर विश्वाची निर्मिती ही बुद्धिपुरस्सर,
हेतुपूर्वक झालेली आहे. कारण विश्वामध्ये
सुसूत्रता, सुसंगति व नियमितता दैसते. जेथे
जेथे आपणास ही सुसूत्रता अनुभवायला येते, तेथे तेथे त्याच्या मागे कोणीतरी सूत्रधार
हा असतोच.
- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "Kenopanishad" by Param
Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013
- हरी ॐ–

