Tuesday, June 20, 2023

वाणीचे सामर्थ्य, दुरुपयोग | The Power, Misuse of Speech

 



हा साधनमार्ग अत्यंत खडतर आहे.  कुठे पाय घसरेल, ते सांगता येत नाही, कारण वाट निसरडी आहे.  जसे, हिमालयामध्ये रस्ता अत्यंत अरुंद आहे, अनेक धोके आहेत.  अत्यंत दक्षतेने, सावधानतेने मार्गक्रमण करावे लागते.  तसेच, आध्यात्मिक जीवन ही सुद्धा एक महान यात्रा आहे.  धोके टाळण्यासाठी वाचेवर नियमन करावे, कारण विश्वामधील जवळजवळ सर्व समस्या या वाणीमधून, शब्दांच्यामधून निर्माण होतात.  शब्दाने हजारो, लाखो माणसे जोडली जातात आणि त्या शब्दांनी आपलीच माणसे दुरावली जातात.  शब्दांचा परिणाम हा एकदम हृदयावर होत असतो.  म्हणून बोलत असताना सतत विचार करून बोलावे.

 

परमपूज्य स्वामीजी नेहमी सांगतात – What I mean that alone I talk and what I talk that alone I mean.”  अशी विचारांची स्पष्टता (clear thinking) जर असेल, तर sorry म्हणावे लागत नाही.  व्यवहारामध्ये रोज आपण दर दोन मिनिटांनी sorry म्हणतो.  “नाही, मी असे म्हटलो, परंतु बोलण्यामागे माझा असा वाईट भाव नव्हता”  हे म्हणणे अत्यंत चूक आहे.

 

म्हणून वाणीवर संयमन करणे ही प्रचंड मोठी साधना आहे.  आपण काय बोलतो ?  कोणाला बोलतो ?  कोठे बोलतो ?  याचे भान असणे अत्यंत आवश्यक आहे.  शब्दाला शब्द, शब्दाला शब्द, शब्दाला शब्द बाहेर पडतात.  एकदा शब्द मुखामधून बाहेर पडले की, त्याचा अन्य व्यक्तीच्या मनावर परिणाम होतोच.  तसेच, जितके मी अधिक बोलतो, त्याप्रमाणात माझी शक्ति क्षीण होते.  मी अस्वस्थ, उद्विग्न, विक्षिप्त होतो.  मनुष्याची जीवनभर अर्धी शक्ति आणि अर्धे आयुष्य बोलण्यामध्येच व्यर्थ जाते.  आपण जे बोलतो, त्यापैकी पुष्कळसा भाग अनावश्यक, विनाकारण असतो.  याचा गांभीर्याने विचार करावा.

 

 

- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मार्च २००७   
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007


- हरी ॐ