Tuesday, September 6, 2022

आत्मज्ञान घेण्यात चूक | Mistake in Self Knowledge Process

 



श्री वसिष्ठ मुनि सांगतात, हे रामा !  ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान गुह्य आहे.  त्यासाठी पुरुषार्थाचा आश्रय घे.  कारण शुभ पुरुषार्थ हा नेहेमीच मोक्षप्राप्तीसाठी अनुकूल असतो.  येथे पुरुषार्थ म्हणजे केवळ शास्त्राचे श्रवण करणे नव्हे.  आपण वर्षानुवर्षे श्रवण करतो. परंतु बाह्य घटपटादि विषयांचे जसे ज्ञान घेतो तसेच आत्मज्ञानाचे सुद्धा ज्ञान घेतो.  "आमची दहा उपनिषदे झाली, गीता झाली."  याप्रमाणे विधाने करतो.

 

म्हणजेच आपण ज्ञेय ब्रह्माला घटपटाप्रमाणे दृश्य वस्तु समजतो.  वही-पुस्तक घेऊन, टिपणे काढून अगदी शाळेसारखा अभ्यास करतो.  काही वेळेस स्वतःच, तर काही वेळेस अनेक साधक एकत्र येऊन आत्म्याची चर्चा करतात.  श्रुति-स्मृति पाठ होतात. चर्चा, सत्संग सुंदर होतो.

 

परंतु सत्संग झाल्यावर ज्यावेळी पुन्हा आपण व्यवहार करतो, त्यावेळी स सच्चिदानंदस्वरूप आत्म्याशी आपला काही संबंधच नाही, असे आपण वागतो.  म्हणजेच अजुनही आत्म्याला एखादी वस्तु समजून आपण वस्तुनिष्ठ ज्ञान घेतो.  त्यामुळे याप्रमाणे कितीही उपनिषदे संपविली, ग्रंथ संपविले तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही.  आत्मज्ञान घेण्याची ही पद्धतच नाही.

 

म्हणून वसिष्ठ मुनि येथे - एकाग्रं चित्तं कुरु |  असा आदेश देतात.  रामा !  मी आता तुला जे सांगणार आहे ते तू मनोभावे ऐक !  काळजीपूर्वक शब्दन् शब्द एकाग्र चित्ताने श्रवण कर.  त्याच्या भावार्थाचे चिंतन कर.  तुझ्या अंतःकरणात उत्कट भाव निर्माण झाला तरच तुला हे ज्ञान समजेल.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ