Tuesday, September 20, 2022

शास्त्रश्रवणातील दोन नियम | Two Rules Of Partaking Knowledge

 



हे रामा !  शास्त्रश्रवण करताना तुला काही नियम पाळणे आवश्यक आहे.  कारण मी तुला हे भवरोगावरचे अत्यंत प्रभावी औषध देणार आहे.  औषध घेण्याबरोबरच पथ्येही पाळावी लागतात.  त्याप्रमाणेच आत्मज्ञान ग्रहण करताना साधकाला काही नियम, पथ्य पाळणे आवश्यक आहे.  अन्यथा ज्ञानरूपी दिव्य औषधीचा उपयोग होत नाही.

 

पहिले पथ्य असेल तर ते म्हणजे - इंद्रियसंयमन !  जन्मतःच आपली इंद्रिये अतिशय बलवान असून इंद्रियांना भयंकर सवयी लागलेल्या असतात.  त्यामुळे इंद्रिये पुन्हा-पुन्हा मनाला खेचून विषयांच्यामध्येच प्रवृत्त करतात.  म्हणून साधकाने सर्वप्रथम आपल्या इंद्रियांच्यावर पूर्णतः संयमन प्राप्त करावे.  आपण साधना कोणत्याही मार्गाने करीत असू तरी हे पथ्य पाळणे आवश्यक आहे.  ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, कर्ममार्ग, योगमार्ग अशा कोणत्याही मार्गाने जायचे असेल तरी इंद्रियसंयमन आवश्यक आहे.

 

यानंतर दुसरी साधना म्हणजे आपल्या मनामधील व्यर्थ मनोरथ कमी करणे होय.  मनुष्य जीवनामधील मुख्य काम सोडून पुष्कळ वेळेला व्यर्थ गोष्टी करण्यामध्ये आयुष्याचा वेळ घालवितो.  म्हणून येथे वसिष्ठ मुद्दाम अवांतर म्हणजे व्यर्थ हा शब्द वापरतात.  पुष्कळ वेळेला मनुष्य अनेक ऐहिक आणि पारलौकिक इच्छा करतो.  त्या पूर्ण करण्यासाठी अनेक कर्मांच्यामध्ये रात्रंदिवस प्रवृत्त होतो.  मनुष्य याप्रमाणे एकदा मनोरथ करू लागला की, त्याला काळाचे भान राहत नाही.  म्हणूनच वसिष्ठ मुनि या सगळ्या इच्छांचा त्याग करून आपल्या मनावर नियमन करण्याची साधना देतात.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ