Tuesday, April 17, 2018

मानित्वाचे दुष्परिणाम | Adverse Effects of Pride



मानित्वाचा आपल्या मनावर कोणता परिणाम होतो ?

१) मानित्वाच्या वृत्तीमुळे आपल्या मनामध्ये अपेक्षा वाढतात.  महत्त्वाकांक्षा वाढतात.  दुसऱ्यापेक्षा मी मोठा होईन, हा एकच ध्यास असतो.  त्यामुळे मन जास्तीत जास्त बहिर्मुख होऊन विषयासक्त होते.  जितके विषय अधिक तितका मी मोठा, या कल्पनेमुळे तो सतत विषयांचेच चिंतन करतो.  असे कामुक मन मनुष्याला स्वस्थ बसू देत नाही.  असा मनुष्य वर्तमानकाळात न जगता भविष्यकाळात जगत असतो.  एक अपेक्षा पूर्ण झाली की, त्यामधून पुन्हा दुसरी, तिसरी अपेक्षा याप्रमाणे असंख्य अपेक्षा निर्माण होतात.  त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मनुष्य रात्रंदिवस धडपडतो.  जीवाचे रान करतो.  अनेक स्वप्ने रंगवून त्यामध्येच रममाण होतो.  पूर्वायुष्यामध्ये आपण सर्वजण उज्ज्वल भवितव्याचे दिवास्वप्न पाहातो.  परंतु वास्तवातील प्रत्यक्ष जीवन मात्र फार वेगळे असते.  

२) सतत भविष्यकाळाचा विचार करीत असल्यामुळे मनुष्य वर्तमानकाळाचा आनंद उपभोगू शकत नाही.  अपेक्षा जास्त असल्यामुळे आज मला जे मिळाले त्या परिस्थितीमध्ये मी कधीही आनंदाने, सुखाने, समाधानाने जगू शकत नाही.  आजचा दिवस मी मनाने मान्यच करीत नाही.  त्यामुळे माझे मन सतत अशांत, अतृप्त, असमाधानी, वखवखलेले असते.  

३) आपले स्वतःचे घरकूल असावे.  सुंदर पत्नी असावी.  घरामध्ये सर्व सुखसोयी असाव्यात, या अपेक्षा केल्यामुळे या गोष्टी मिळाल्या नाहीत तर मन दुःखी, निराश होते.  आपल्या मनात अपेक्षा निर्माण झाली की, ती लगेचच पूर्ण व्हावी, ही माझी इच्छा असते.  त्याबाबतीत आपण लहान मुलापेक्षाही उतावीळ होतो.  वय वाढले, अगदी मृत्यु समोर दिसत असेल तरीही आपण आपल्या अपेक्षा, वासना यांचा त्याग करू शकत नाही.  
   

- "दिव्यत्वाचा मार्ग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, २०१०
- Reference: "
Divyatwacha Marg" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, 2010



- हरी ॐ

No comments:

Post a Comment