Tuesday, April 18, 2017

रामायण – सदसद्विवेकबुद्धी | Ramayana – Power of Discrimination


जानकीपति श्रीराम जेव्हा युद्धाचा निर्णय घेतात, तेव्हा राजनीतीप्रमाणे रावणास शेवटची संधी म्हणून युद्धापासून परावृत्त करण्यासाठी आपल्या पक्षातर्फे अंगदाला रावणाच्या सभेमध्ये पाठवितात.  परंतु अहंकाराची मूर्ति असणारा रावण कोणत्याही प्रकारे तडजोड करण्यास तयार होत नाही.  रावणाला त्याची धर्मपत्नी मंदोदरी सुद्धा अनेक प्रकारे युद्धाचे दुष्परिणाम सांगून रावणाचे मन वळविण्याचा प्रयत्न करते.  जरी मंदोदरी रावणाची धर्मपत्नी असून त्याच्या अत्यंत निकट राहत असते, तरी सुद्धा तिला निश्चितपणे योग्य-अयोग्य, धर्म-अधर्म, नीति-अनीति, न्याय-अन्याय याचे स्पष्ट ज्ञान असते.  मंदोदरी हे आपल्या जीवनामधील सदसद्विवेकबुद्धीचे प्रतीक आहे.  

जीवनामध्ये पुष्कळ वेळेला मनुष्य विकारवश होतो.  विषयवासनांच्या, कामनांच्या, भावनांच्या आहारी जाऊन स्वैर व उच्छृंखल जीवन जगतो.  मन मानेल त्याप्रमाणे वागतो.  परंतु त्यावेळी सतत मनुष्याची बुद्धीच मनुष्याला पावलोपावली योग्य-अयोग्य सांगत असते.  म्हणून तरी आपण मराठीमध्ये पुष्कळ वेळेला म्हणतो – “समजतं पण उमजत नाही !”  मी जे करतो, ते अयोग्य आहे, असे बुद्धीने सांगूनही मन ऐकत नाही.  आपण मनाच्या भावनांचे गुलाम होऊन वाममार्गामध्ये प्रवृत्त होतो.  अशा स्वैर, अनियंत्रित प्रवृत्तीमुळेच मनुष्याचा नाश होतो.  

संत तुलसीदास मंदोदरी व रावणाच्या संवादाचे वर्णन करतात –
अस बिचारि सुनु प्रानपति प्रभु सब बयरु बिहाइ |
प्रीति करहु रघुबीर पद मम अहिवात न जाइ ||
“हे प्राणनाथा !  विचार करून, प्रभूशी वैर सोडून युद्धाचा निर्णय त्याग करावा.  श्रीरघुवीराच्या चरणकमलांवर प्रीति करावी.  त्यामुळे माझे सौभाग्यलेणे अखंड राहील.”  

याप्रकारे मंदोदरी, ही सदसद्विवेकबुद्धि रावणास म्हणजेच उन्मत्त जीवास समजावून देते.  जीवनामध्ये श्रेयस्कर, हितावह सल्ला देते.  


- "दाशरथी राम" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २००७   
- Reference: "
Dasharathi Ram" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2007



- हरी ॐ – 

No comments:

Post a Comment