Tuesday, February 9, 2016

कुलाचाराचे महत्त्व | Importance of Family Values


मनुष्यामध्ये विषयांचा संग्रह करण्याची आणि उपभोगण्याची स्वाभाविक प्रवृत्ति आहे.  यामधूनच विषयांची कामना निर्माण होते.  आणि कामनापूर्ती व उपभोग हेच जीवनाचे अंतिम ध्येय झाले तर मनुष्य कोणत्याही मार्गाचा अवलंब करून आपल्या कामना पूर्ण करतो.  यामुळेच तो नियम, नीतिमुल्ये, आचारधर्म यांना झुगारून देतो आणि हळूहळू स्वैर, उच्छृंखल होऊन पापाचरणामध्ये प्रवृत्त होतो.

या स्वैर, वैषयिक, पशुतुल्य जीवनापासून निवृत्त करण्यासाठी, त्याच्या कामुक प्रवृत्तीवर नियमन घालण्यासाठी, इंद्रियांच्यावर संयमन करण्यासाठी, उदात्त आचार-विचारांचे जीवन जगण्यासाठी, त्याच्या जीवनाला निश्चित दिशा देण्यासाठी या सर्व कुलधर्म, जातीधर्मांचे प्रयोजन आहे.  ते मनुष्याच्या मनात श्रद्धा, भक्ति, सेवा, त्याग, स्वकर्तव्यपरायणता, प्रेम वगैरे श्रेष्ठ सात्विक गुणांची जोपासना करतात.  मानसिक विक्षेप, द्वंद्व कमी करून मन शांत, अंतर्मुख करण्याचे साधन होतात.

हे सर्व शिकविणार कोण ?  कुटुंबसंस्था जर संकारयुक्त असेल, तर त्यातल्या प्रत्येक मनुष्याचे सामाजिक जीवनही या मूल्यांच्यावर आधारित असल्यामुळे आपोआपच समाजातही ही नीतिमूल्ये जोपासली जातील, समाज सुसंस्कृत, समृद्ध, कर्तव्यपरायण होईल.  नाहीतर नीतिमूल्ये, जीवनमूल्यांच्याशिवाय व्यक्तिगत आणि सामाजिक जीवन स्वैर होऊन माणसातली माणुसकी नाहीशी होऊन माणूस पशू बनेल.  म्हणून जीवनमूल्यांची जपणूक आणि संवर्धन करणारी उत्कृष्ट संस्कारक्षम कुटुंबसंस्था आवश्यक आहे.  पर्यायाने तीच समाजातील जीवनमूल्ये ठरविते.

म्हणून प्रत्येक पिढीचे एक महत्वाचे कार्य आहे – अनादिकाळापासून चालत आलेले आचारधर्म, कुलधर्म मागच्या पिढीकडून घेऊन आत्मसात करावेत आणि पुढच्या पिढीला आपल्या आचार-विचारामधून द्यावेत.  आजपर्यंत ही अखंड परंपरा चालू आहे.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002




- हरी ॐ

No comments:

Post a Comment