Tuesday, January 12, 2016

कर्मफळाची प्रतिक्रिया | Reaction to Outcomes



कर्माचे मुख्यतः दोन प्रकार आहेत.  पहिल्या प्रकारात मनुष्यनिर्मित कर्म असून त्यालाच पौरुषेय अथवा व्यावहारिक कर्म म्हणतात.  उदा. झाडणे, समाजसेवा करणे, बांधकाम करणे इत्यादि.  दुसऱ्या प्रकारात पूजा, अर्चना, भजन, कीर्तन, धार्मिक, वैदिक कर्म हे अपौरुषेय कर्म आहे.

कर्माचा कर्ता, जीवात्मा हा केवळ कर्म करत नाही तर कर्म पूर्ण होण्याच्या अगोदरच त्या कर्माचे फळ किती मिळेल ?  ते फळ काय असेल ?  कसे मिळेल ?  याची कल्पना किंवा अपेक्षा मनात करत असतो.  किंबहुना फळाची निश्चित कल्पना, अपेक्षा करूनच तो कर्मात प्रवृत्त होतो.  त्यामुळे त्याचे कर्म करण्यात लक्ष नसून ते कर्मफलावर असते.  फलाबाबत ‘Preconceived Judgement’ असते.  त्याचमुळे कर्म पूर्ण झाल्यावर अपेक्षेप्रमाणे फळ मिळाले की नाही ?  याचे तो मूल्यमापन (Evaluation) करतो.

कर्मफल एकच असले तरी त्यातून दोन प्रकारच्या प्रतिक्रिया (Reactions) होतात.  कारण फळ अपेक्षेप्रमाणे असते किंवा नसते.  ते फळ अगोदरच कल्पिलेल्या अपेक्षेप्रमाणे मिळाले तर त्या फलाचा तो आपोआपच स्वीकार करतो व त्यामुळे तो एकदम आनंदी होतो, काही वेळेला हुरळून जातो.  कोणत्याही फलाचा स्वीकार करताना मनात राग व द्वेष (Likes and Dislikes) असतातच.  अपेक्षित फलाचा स्वीकार करण्यात रागद्वेषाच्या प्रतिक्रिया नाहीशा होतात व मन प्रतिक्रियाविरहित म्हणजेच Free from Reactions होते.  अशा प्रतिक्रियारहित मनात आनंद अनुभवास येतो.

याउलट ते फल अपेक्षेप्रमाणे नसेल, मनाविरुद्ध असेल किंवा कमी असेल तर त्या फळाचा मन स्वीकार करत नाही.  ते फळ धुडकावून लावले जाते व त्यामुळे होणारी प्रतिक्रिया म्हणजे एकदम मनात क्षोभ उफाळून येतो.  मन खूप निराश होते, संताप येतो व द्वेषाची भावना निर्माण होते.  मनात विक्षेप येतात व मन दुःखी होते.


- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005




- हरी ॐ

No comments:

Post a Comment