Tuesday, January 13, 2015

अपरिग्रह | Non-Possession



ज्या साधकाला खरोखरच अभ्यास करायचा असेल, शास्त्राध्ययन करायचे असेल, श्रवण, मनन, निदिध्यासना करायची असेल तर संग्रहाचा त्याग करणे अत्यंत आवश्यक आहे.  यालाच ‘अपरिग्रह’ असे म्हणतात. किंवा भगवान म्हणतात –

विविक्तदेशसेवित्वमरतिर्जनसंसदि | (गीता अ. १३ – १०)

साधना करीत असताना निदान सुरुवातीला काही काळ जनसंपर्काचा त्याग करून एकांतवास आवश्यक आहे.  खरोखरच अत्यंत कमीत कमी गरजांच्यामध्ये विषयांच्याशिवाय, भोगांच्याशिवाय इतकेच नव्हे, तर माणसांच्याशिवाय मी जगू शकतो, हे स्वतःच अनुभवले पाहिजे.  परमेश्वरावर खऱ्या अर्थाने निर्भर होऊन जीवन जगण्याची मनाची धारणा झाली पाहिजे.

कारण जितके आपल्या सभोवती विषय, भोग, माणसे आहेत, तितके विक्षेप वर्धन पावतात.  एकेक क्षुल्लक विषय किंवा कामना सुद्धा अनेक विकल्पांना कारण होते.  श्रवणादि साधनेमध्ये अनेक द्वंद्व, विक्षेप, प्रतिबंध निर्माण होतात.  आपण विषयांच्यावर, माणसांच्यावर अवलंबून राहतो.  शरीराने अवलंबून असणे हा दोष नाही, परंतु मनाने दुसऱ्यावर अवलंबून असणे हा प्रचंड मोठा दोष आहे.


कदाचित शरीराने आपण एकटे राहू शकू परंतु विषय, माणसे नसतील की, मी अस्वस्थ होतो, व्याकूळ होतो.  काय करावे ?  काहीच सुचत नाही.  एकांतवास असह्य होतो.  मन सतत कोणालातरी पकडण्याचा प्रयत्न करते.  असे मन साधना करण्यास अत्यंत प्रतिकूल आहे.  म्हणूनच येथे – मा गृधः |  यामधून श्रुति संग्रहवृत्तीचा त्याग करण्यास सांगते.


- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009


- हरी ॐ

No comments:

Post a Comment