Tuesday, July 8, 2025

संग आणि संगविवर्जित | Attachment And The Unattached

 



ज्ञानी पुरुष स्वतःच्या मनामधील पूर्वग्रहदूषित कल्पना, रागद्वेष, कलुषितता काढून अत्यंत शुद्ध, स्वच्छ, रागद्वेषरहित मनाने विश्वाकडे पाहातो.  त्याला सर्व विश्वामध्ये शुद्धतेची, मांगल्याची, पावित्र्याची अनुभूति येते.  तो शीत-उष्ण, सुख-दुःख या सर्व द्वन्द्वांच्यामध्ये समतोल राहातो.  तोच 'सङ्ग्विवर्जितः' होतो.  असंगस्वरूप होतो.  याठिकाणी आचार्य प्रथम 'संग' या शब्दाचा अर्थ सांगतात.  मान-अपमान, शीत-उष्ण वगैरेदींचा अनुभव अहंकार घेतो.  हा अहंकार साभास म्हणजेच अज्ञानजन्य असून मिथ्या स्वरूपाचा आहे.  अहंकाराला स्वतःची स्वतंत्र सत्ता नाही.  अशा मिथ्या, भासात्मक अहंकाराशी तादात्म्य पावल्यामुळेच मी कर्ता-भोक्ता, सुखी-दुःखी, जन्ममृत्युयुक्त, संसारी हे सर्व अध्यास निर्माण होतात.  या अध्यासालाच 'संग' असे म्हणतात.

 

अहंकाराशी तादात्म्य पावल्यामुळेच जीव संसाराचा, सुख-दुःखांचा अनुभव घेतो.  वास्तविक पाहाता अहंकार सुद्धा मिथ्या, भासात्मकच आहे.  आत्मचैतन्यामध्येच आश्रित, अध्यस्त आहे.  अहंकाराला स्वतःची स्वतंत्र सत्ता नसून ती आत्मचैतन्याचीच सत्ता आहे.  आत्मचैतन्याच्या सत्तेमुळेच अहंकाराचे रक्षण, वर्धन, पोषण होते.  हा जसा जसा वाढायला लागतो तसतसा तो आपल्या अधिष्ठानाला - आत्मचैतन्याला विसरतो.  प्रत्येक प्रसंगामधून सतत 'मी' - 'मी' असे अस्तित्व दर्शवितो.

 

एखादे भूत जसे हात धुऊन मागे लागते तसेच प्रत्येक जीवाच्या मागे अहंकाररूपी भूत लागलेले आहे.  हा अहंकार मनुष्याला गुलाम बनवून नाचवितो, भ्रमिष्ट करतो.  स्वस्वरूपापासून च्यूत करून मनुष्याचा नाश करतो.  मनुष्याभोवती कल्पनांचे जाळे तयार करून त्या जाळ्यामध्ये घट्ट अडकवितो.  क्षणाक्षणाला उफाळून बाहेर येतो.  त्या अहंकाराशी तादात्म्य पावणे म्हणजेच 'संग' आहे.  परंतु अहंकाराशी जो तादात्म्य पावत नाही तोच 'सङ्ग्विवर्जित', ज्ञानी पुरुष आहे.  तो आत्मज्ञानाच्या सामर्थ्याने अज्ञानाचा ध्वंस करून अहंकाराचा पूर्णतः निरास करतो.  यामुळे अहंकारामधून निर्माण झालेल्या मान-अपमान, सुख-दुःख या कल्पनांचाही पूर्णतः निरास होतो.  तोच सङ्ग्विवर्जित, संगरहित होतो.  त्याचा अहंकार म्हणजेच 'कार' प्रत्यय निरास झाल्यामुळे राहाते ते असंगस्वरूप, आत्मस्वरूप !  त्या स्वरूपामध्ये स्थिर झाल्यामुळे तो समदर्शी होतो.  त्याचा अहंकार पूर्णतः गळून पडतो.  विरून जातो.

 


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ




Tuesday, July 1, 2025

दृश्य जगाचे मूळ कारण काय? | Root Cause Of Visible Universe

 




हे जग डोळ्यांना दिसत आहे.  दिसत असेल तर ते नक्कीच उत्पन्न झाले आहे आणि जग उत्पन्न झाले असेल तर त्या जगाला काहीतरी कारण हे असलेच पाहिजे.  करणं विना कार्यं न सिध्यति |  कारणाशिवाय कार्याची सिद्धि होत नाही, असा न्याय आहे.  मग येथे दिसणारे हे विश्व कोठून व कसे उत्पन्न झाले ?  हा प्रश्न आहे.

 

म्हणून विश्वाच्या कारणाचा सर्वजण शोध घेत आहेत.  परंतु जसे रज्जु-सर्प दृष्टांतामध्ये आपल्याला साप दिसतो.  तो साप कोठून उत्पन्न झाला ?  असा विचार करू लागलो तर तो साप दोरीमधून उत्पन्न झाला, हे त्याचे उत्तर आहे.  पण असे उत्तर मिळाले तरी सापाची प्रत्यक्ष निर्मिती झालेलीच नाही, ही वस्तुस्थिति आहे.  तरीही जोपर्यंत आपणास तो साप दिसत आहे, तो खरा वाटत आहे, तोपर्यंत आपणास दुसरा पुरुष समजावून देतो की, “अरे !  तुला जरी तो साप दिसत आहे, तो दोरीमधून उत्पन्न झाल्यासारखा वाटत आहे”, तोपर्यंतच दोरी हे त्या सापाचे कारण आहे.

 

परंतु ज्यावेळी आपणास समजेल की, अरे !  हा खरा साप नसून केवळ भास आहे, दोरीच केवळ सत्य आहे.  साप वस्तुतः उत्पन्नच झालेला नाही.  त्यामुळे सापाच्या निर्मितीचे खरे कारण दोरी असूच शकत नाही.  म्हणून दोरी व साप यांच्यामध्ये कारण-कार्यभाव शक्य नाही.  कारण येथील भ्रमात्मक सापाच्या निर्मितीमध्ये अन्य सहकारी कारणांचाही अभाव आहे.  त्यामुळे सिद्ध होते की, सापाची निर्मिती ही खरी नसून कल्पित आहे.

 

व्यवहारामध्ये आपण जेव्हा प्रत्यक्ष निर्मिती पाहतो तेव्हा तेथे मुख्य करणाबरोबरच अन्य सहकारी कारणे सुद्धा असतात.  जसे मातीपासून घट निर्माण होताना माती या कारणाबरोबरच पाणी, चाक वगैरेदि सहकारी करणे आहेत.  ही सर्व कारणे एकत्र येऊन घटाची प्रत्यक्ष निर्मिती होते.  मात्र दोरीमधून आपणास जो साप दिसतो त्यामध्ये सहकारी कारणांचा अत्यंत अभाव आहे.  म्हणून साप हा दोरीतून निर्माण झाल्यासारखा वाटला तरी तो कल्पितच आहे.  त्यामुळे दोरी व साप यांच्यामध्ये जसा कारण-कार्यभाव नाही, तसेच परब्रह्मामधून हे विश्व प्रत्यक्ष उत्पन्नच झालेले नाही.  कारण येथे परब्रह्माशिवाय अन्य वस्तु अस्तित्वातच नसल्यामुळे सहकारी कारणांचाही अभाव आहे.

 

म्हणून ब्रह्म व विश्व यांच्यातही कारण-कार्य संबंध सिद्ध होत नाही.  त्यामुळे ब्रह्मस्वरूप हे अद्वय व अधिष्ठानरूप असून दिसणारे विश्व हे पूर्णतः मिथ्या, कल्पित आहे.  हाच येथे अभिप्राय आहे.

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ