Tuesday, April 1, 2025

सत्संग - एकमेव महान औषध | Satsang - The Only Great Medicine

 




सत्संगाच्या प्रभावाने संकटे जणु काही थिजून जातात.  जोपर्यंत आपण सत्संगामध्ये आहोत, ईश्वराचे संकीर्तन, भजन ईशकथा श्रवण करीत आहोत, तोपर्यंत तेथे यमराज सुद्धा प्रवेश करू शकत नाहीत.  जेथे साधु आहेत तेथे संकटे येऊ शकत नाहीत. जेथून साधु पुरुष - संत पुरुष दूर जातात, तेथे अनर्थ घडु लागतो.  मात्र जेथे संत आहेत, जेथे सत्संग आहे, तेथे संकटे आली तरी ती निघूनही जातात.  जसे बर्फ कमळाच्या फुलाला थिजवून टाकते, तसेच सत्संगामुळे आपल्या आयुष्यात येणाऱ्या सर्व संकटांची ताकद निघून जाते.  संकट हे संकट वाटत नाही.

 

वाऱ्याने जसे धुके क्षणार्धात नष्ट होऊन समोरचे स्पष्ट दिसते, त्याप्रमाणे सत्संगामुळे विषयमोहाचे धुके क्षणार्धात नष्ट होते.  सत्संगामध्ये विषयांचे आकर्षण, भोगासक्ति नाहीशी होते.  म्हणून जगात सर्व संकटे आणि सर्व मोह यांना पराभूत करून विजयी होणारा सत्संगच आहे.

 

असा हा सत्संग मनुष्याच्या बुद्धीचे वर्धन करतो.  अज्ञानरूपी वृक्षाचा समूळ छेद करतो आणि मनुष्याची सर्व मानसिक दुःखे नाहीशी करतो.  म्हणून जेथे सत्संग आहे तेथेच बुद्धीचा विकास आहे.  जसे सूर्योदय झाल्यावर विश्वामधील अंधार नाहीसा करण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत.  सूर्योदय होताक्षणीच अंधार आपोआपच नाहीसा होतो.  तसेच सत्संगामध्ये आपल्या बुद्धिमधील अज्ञानरूपी वृक्षाचा छेद होतो.  शिष्याच्या अंतःकरणामधील अज्ञान ज्ञानशलाकेने नाहीसे करून जे शिष्याचा ज्ञानचक्षु उघडून देतात तेच खरे गुरु होत.  इतकेच नव्हे तर मनुष्याला अनेक मानसिक व्याधि आणि या भवरोगाने जन्मानुजन्मे ग्रासले आहे.  या सर्व, दुःख, शोक, मोहात्मक रोगांचा नाश करावयाचा असेल तर सत्संग हे एकमेव महान औषध आहे.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ