Showing posts with label non-resolution. Show all posts
Showing posts with label non-resolution. Show all posts

Tuesday, April 14, 2026

संकल्परहित आत्मचैतन्यस्वरूप | Self-Conscious Non-Resolution

 



हे राघवा !  हे संसाररूपी अरण्य असून त्यामध्ये मनोरूपी बीजापासून सप्तलोकरूपी पल्लव उत्पन्न होतात व त्यांच्यावर शुभाशुभरूपी सुखदुःखात्मक फळे येतात.  म्हणजे भूः, भुवः, स्वः, महः, जनः, तपः, सत्यं हे सात लोक व त्या लोकांच्यामध्ये प्राप्त होणारी चांगली-वाईट सुखदुःखात्मक फळे या सर्वांचे कारण मन आहे.  या सर्वांच्यापासून मुक्त व्हावयाचे असेल, तर राघवा ! प्रथम संकल्पांचा त्याग कर.  संकल्पांचा त्याग केलास तर तुला सर्व सिद्धि देणारे संकल्परहित साम्राज्य प्राप्त होईल.

 

म्हणून संकल्परहित आत्मचैतन्यस्वरूप साम्राज्यामधील सिंहासनावर आरूढ वाहावयाचे असेल तर तू संकल्पांचा निःशेष त्याग कर.  अग्नीची धग पूर्णतः नाहीशी करावयाची असेल तर त्या अग्नीमधून जळत असणारी लाकडे पूर्णतः बाहेर काढली पाहिजेत.  त्याचप्रमाणे ज्याला ब्रह्मपद प्राप्त करावयाचे आहे, त्याने आपल्या मनातून कामना - संकल्परुपी इंधन बाहेर काढले पाहिजे.  तरच संकल्परहित झालेले ते मन हळूहळू शांत होऊ शकेल आणि त्या मनामध्ये निरतिशय आनंदाचा अनुभव येईल.

 

जोपर्यंत मन संकल्परहित होत नाही, तोपर्यंत या चिदाकाशामध्ये अज्ञानी जीवाला नानाविध असणारी असंख्य ब्रह्माण्डे भिन्न-भिन्न रूपाने दिसतच राहतात.  अशा या मनानेच जणु काही आपल्या संकल्परुपी ऐश्वर्याने कोट्यावधी ब्रह्माण्डे उत्पन्न करून स्वतःच स्वतःवर शोकमोहादि अनर्थपरंपरा ओढवून घेतली आहे.  मनानेच संसार उत्पन्न करून जीव त्या संसारामध्ये बद्ध झाला आहे.  हे राघवा !  यावर आता एकच उपाय आहे, तू या संकल्पांचा त्याग कर.  मनामधील आसक्ति दूर कर.  आत्मतृप्तिरूपी ऐश्वर्याने या मनावर विजय मिळव.  राघवा !  संकल्प हे खरे ऐश्वर्य नसून आत्मतृप्ति हेच खरे ऐश्वर्य आहे.  म्हणून संतोष हा परमगुण आहे.  आत्मतृप्त पुरुष अनासक्त मनाने आपल्या मनावर विजय मिळवतो.

 

याप्रमाणे जे चित्त संकल्परहित झाले आहे, अशा परमपावन तसेच अत्यंत समबुद्धीने युक्त असणाऱ्या, शांत झालेल्या, अहं-ममकारादि भावना निरास झालेल्या चित्तामध्येच आत्मज्ञान उदयाला येते.  हे राघवा !  याप्रमाणे ज्ञानाने सर्व दृश्याचा तसेच जन्म, मृत्यु वगैरेदि कल्पनांचा, अहं-मम प्रत्ययांचा निरास झाला की, जे अज, नित्य, शाश्वत, चिरंतन, निर्विशेष, निरतिशय पद शिल्लक राहते, ते श्रेष्ठ पद तुला प्राप्त होवो !  

 

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ



Tuesday, March 17, 2026

असंकल्परूपी शस्त्र । Weapon Of Non-Resolution

 



हे राघवा !  असंकल्परूप शस्त्राने जेव्हा चित्ताचे छेदन केले जाते, तेव्हाच सर्वस्वरूप, सर्वव्यापी व शांतस्वरूप असणाऱ्या ब्रह्मपदाची प्राप्ति होते.  संकल्पांचा निःशेष त्याग करणे हाच एकमात्र उपाय आहे.  संकल्पांचा त्याग झाल्याशिवाय चित्त ब्रह्मपदामध्ये स्थिर होऊ शकत नाही.  म्हणून संकल्परहित होणे, हेच चित्तछेदनाचे मोठे व प्रभावी शस्त्र आहे.  ज्याने असे सर्व संकल्प त्याग केले आहेत, तोच सर्व अनर्थांच्यापासून मुक्त होऊन आत्मज्ञानाच्या साहाय्याने शांतस्वरूप असणाऱ्या ब्रह्मपदामध्ये स्थिर होतो.  अशा या आत्मस्थ पुरुषाच्या शरीराला कोणत्या यातना होणार ?  अर्थातच ज्ञानी पुरुष, जीवन्मुक्त पुरुष मनाच्या यातनांच्यामधून तर मुक्त होतोच, परंतु यदाकदाचित त्याला शारीरिक यातना झाल्या तरीही तो विचलित होत नाही.  शरीरयातनांचा त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही.

 

हे राघवा !  मूढ लोक संकल्प करून देवाची सुद्धा कल्पना करतात.  त्यांच्या अज्ञानाला काय म्हणावे ?  परंतु रामा !  तू मात्र दैवाधीन न होता पुरुषार्थाच्या साहाय्याने तुझे चित्त अचित्त अवस्थेला घेऊन जा.  म्हणजेच तुझ्या चित्तामधील सर्व वृत्तींचा व आसक्तीचा त्याग कर.  याप्रकारे चित्त विषयवृत्तिरहित झाले की, मग निरतिशय असणाऱ्या महापदवीला म्हणजेच स्वस्वरूपाला जाऊन पोहोचते.  याप्रमाणे दीर्घ अभ्यासाने या चित्ताला तू तुझ्या चैतन्यरूपाने भक्षण करून तू चित्तच्याही अतीत हो.  त्यासाठी प्रथम तू पारमार्थिक बुद्धीने युक्त होऊन दृढ असणारी आत्मभावना निर्माण कर.

 

याप्रमाणे अत्यंत अव्यग्रतेने म्हणजे एकाग्रतेने आत्मधरणा केलीस की, मग आपोआपच ते चित्त परमपदामध्ये स्थिर होईल.  त्यासाठी परमपुरुषार्थाचा आश्रय घे. चित्ताला अचित्त अवस्थेला ने.  याप्रमाणे चित्त वृत्तिरहित झाले की, मग तुला महापदवी म्हणजे निरतिशय चैतन्यस्वरूप प्राप्त होईल.  एकदा ते स्वरूप प्राप्त झाल्यानंतर पुन्हा त्याचा कधीही नाश होत नाही.  हे राघवा !  हा सर्व अभ्यासाचा भाग आहे.  आपणच आपल्या मनाला अत्यंत दक्ष राहून व प्रामाणिकपणे कसे संयमित करतो, यावरच मनाची शुद्धि, वैराग्य, ज्ञानाचा उदय, धारणा, ज्ञाननिष्ठा व स्वस्वरूपाची सहजावस्था अवलंबून आहे.  म्हणून रामा !  मन संकल्परहित करणे हा साधकाचा महत्त्वाचा पुरुषार्थ आहे.

 

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ