Showing posts with label Greed. Show all posts
Showing posts with label Greed. Show all posts

Sunday, July 29, 2018

धनाची तृष्णा | Thirst for Wealth




सर्वच मनुष्यांच्यामध्ये धनप्राप्तीची केवळ इछाच नाही तर धनाची तृष्णा आहे, कारण धन हे विषयप्राप्तीचे प्रमुख साधन आहे.  कोणताही विषय प्राप्त करावयाचा असेल, आपले जीवन सुखसोयींनी समृद्ध करायचे असेल तर धन हेच साधन आहे.  यामध्ये कोणतीही शंका नाही.  त्यामुळे धन हे वाईट नाही.  

परंतु व्यवहारामध्ये जीवन जगत असताना मनुष्य जेव्हा या धानालाच साध्य समजायला लागतो, तेव्हाच समस्यांना प्रारंभ होतो.  धनप्राप्ति हेच माझ्या जीवनाचे इतिकर्तव्य आहे, जितके धन अधिक तितका मी अधिक सुखी !  त्यामुळे धनाचे सातत्याने येन केन प्रकाराने वर्धन करणे, हेच माझे ध्येय आहे.  हा विचार मनुष्याला घातक आहे.  हीच धनाची तृष्णा आहे.  धनाच्या या तृष्णेमुळे मनुष्याच्या जीवनावर अनेक विपरीत परिणाम होतात.  

माणसाच्या मनामध्ये सतत लोभ, मोह वाढतात.  माणसाची बुद्धि मोहाने आवृत्त झाली की, त्याच्यामधील विवेक कमी-कमी व्हायला लागतो.  मनुष्य सुरुवातीला प्रामाणिक असतो.  सत्कर्म, सदाचार, यांच्या साहाय्याने सरळ मार्गाने कष्ट करून धन मिळवितो.  परंतु पैसा जरा जास्त म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त मिळायला लागला की, लोभ निर्माण होतो.  पैशाचा हव्यास वाढतो.  असा पैशाचा लोभी मनुष्य मोहीत होऊन त्याची बुद्धि भ्रष्ट होते.  अशा दुराचारी मनुष्याच्या मनामध्ये इतर माणसांच्याबद्दल द्वेष, असुया, मत्सर, क्रोध, कपट, चिंता असे अनेक विकार निर्माण होतात.  मनुष्य काही वेळेला व्यसनाधीन सुद्धा होतो.  

धनाच्या इच्छेमधुनच दुसरी लोकेच्छा निर्माण होते.  म्हणजे मानसन्मान, प्रतिष्ठा, कीर्ति यांची इच्छा होय.  या अपेक्षा मनुष्याला सुखाने, शांतीने जगू देत नाहीत.  म्हणुनच आचार्य इथे सांगतात की, हे मनुष्या !  तू या धनाच्या तृष्णेचा त्याग कर, कारण धन हे जीवनाचे साध्य नसून केवळ साधन आहे.  शरीराचे पोषण, वर्धन, रक्षण करून जीवन सुकर करण्यासाठी धनाचा निश्चितपणे उपयोग आहे.  मात्र धनाला फाजील महत्त्व देऊ नये.  धनाच्या लोभाचा, तृष्णेचा त्याग करावा.  

  
- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015


- हरी ॐ





Wednesday, January 7, 2015

संग्रह्वृत्ती | The Attitude of Accumulation



मा गृधः | गृधिं मा कार्षिः इत्यर्थः |

धनाबद्दल असणारी जी आसक्ति किंवा इच्छा तिचा त्याग करावा.  आज सर्व जीवांची धनसंग्रह करण्याचीच प्रवृत्ति आहे.  मनुष्य जन्मल्यापासून मृत्युपर्यंत अनेक विषय, उपभोग, संपत्ति, स्थावरजंगम मालमत्ता, सत्ता, कीर्ति, यश, मान-सन्मान या सर्वांचा संग्रह करीत असतो.  ‘जितका आपण संग्रह करू, तितके आपण जास्तीत जास्त सुखी होऊ’ अशी त्याची कल्पना असते.

संग्रह केल्यामुळे कदाचित काही प्रमाणामध्ये आपल्या दैनंदिन समस्या, problems कमी झालेले दिसतात.  परंतु हीच संग्रहाची वृत्ति अत्यंत घातक ठरते.  संग्रह करणे वाईट नाही. परंतु संग्रहवृत्ति मात्र अत्यंत वाईट आहे.  त्या संग्रहाच्या वृत्तीमुळेच मनामध्ये अनेक प्रकारचे विक्षेप येतात, मन त्याच संग्रहीत विषय, भोग आणि व्यक्तींच्यामध्येच गुंतून राहते.

Planning करण्यामध्येच आयुष्य निघून जाते.  पैसे किती मिळवावेत, कसे मिळवावेत, १ लाखाचे २ लाख कसे करावेत, पैशाचा विनियोग कसा करावा, पैसे कोठे व कसे गुंतवावेत ?  या सगळ्या नियोजनामध्ये मन अत्यंत बहिर्मुख होते.

मनुष्य तेथेच थांबत नाही तर त्याची संग्रहवृत्ति दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जाते.  या वृत्तीमुळे तो स्वतःचे जीवन शांत जगू शकत नाही.  तो विषयांच्याशिवाय, भोगांच्याशिवाय राहू शकत नाही.


- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009



- हरी ॐ