Tuesday, May 27, 2025

शेकडो तीर्थांचे दर्शन | Hundreds Of Pilgrimages





हे राघवा !  सत्संगाचा महिमा अगाध आहे.  ज्याने या सत्संगरूपी शीतल गंगेमध्ये स्नान केले आहे, त्याला दान, अन्य तीर्थे, तप, किंवा यज्ञयाग या साधनांची आवश्यकता राहत नाही.  कारण साधु हे स्वतःच तीर्थस्वरूप असतात.  गंगेप्रमाणे स्वतः अत्यंत शुद्ध असून दुसऱ्यांनाही पवित्र करतात.  म्हणून म्हटले आहे –

साधूनां दर्शनं पुण्यं तीर्थभूता हि साधवः |  कालेन फलते तीर्थं सद्यः साधुसमागमः ||  (शुकसप्ततिः)  

 

साधु हे स्वतःच तीर्थस्वरूप असून त्यांचे दर्शनही पुण्यकारक आहे.  त्यांचे दर्शन घेणे म्हणजे शेकडो तीर्थांचे दर्शन घेण्याप्रमाणे आहे.  बाहेरचे तीर्थ काही काळाने फलद्रूप होते.  परंतु सत्संगरूपी तीर्थाचे फळ मात्र तात्काळ प्राप्त होते.  म्हणून सत्संग हा गंगेप्रमाणे अत्यंत शुद्ध, पवित्र व शीतल आहे.

 

अशा सत्संगरूपी तीर्थामध्ये ज्यांनी स्नान केले आहे, ज्याचे मन सत्संगामध्ये, गुरुसेवेमध्ये तल्लीन, तन्मय आणि तद्रूप झाले आहे, त्यांना दान, तीर्थयात्रा, भ्रमण, भिन्न-भिन्न तपश्चर्या किंवा यज्ञयागादि कर्म अशा कोणत्याही बहिरंग साधनांचे प्रयोजन राहत नाही.  याचे कारण संत हे स्वतः तीर्थस्वरूप असून ते तीर्थालाही पावन करणारे आहेत.

 

जेथे जेथे संत जातील, ती भूमि, तो प्रदेश, ते स्थान, तेथिल प्राणी, माती, तेथिल जीवजंतु, सर्वच काही पवित्र होऊन जाईल.  यामध्ये तिळमात्र शंका नाही.  म्हणून वसिष्ठ मुनि येथे म्हणतात की, "हे रामा !  जो सत्संगामध्ये आहे, गुरूंची मनोभावे सेवा करीत आहे, त्याला आपोआपच चित्ताची शुद्धि, दैवीगुणसंपत्ति मिळून ज्ञानाची प्राप्ति होईल.  त्याला वेगळे काही करण्याची आवश्यकता नाही."

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ



Tuesday, May 20, 2025

संपूर्ण तोटा | Infinite Loss

 



व्यवहारामध्ये एखाद्या धंद्यामध्ये जर नाश झाला, संपूर्ण तोटाच झाला तर कदाचित पुन्हा प्रयत्नाने धंद्याचा जम बसविता येईल.  परंतु मनुष्यजन्मामध्ये येऊनही आत्मस्वरूपाचे ज्ञान न झाल्यामुळे होणारी हानी ही भयंकर विनाशकारी आहे.  स्वस्वरूपाचे ज्ञान न झाल्यामुळेच मनुष्य अज्ञानवश होतो.  अज्ञानामधून अध्यासाची निर्मिती होते आणि एकदा अध्यास झाला की, जीव जन्मानुजन्मे त्या अध्यासामध्येच जगतो.  जन्माला आल्याबरोबर शरीराशी तादात्म्य पावतो व स्वतःला मर्त्य म्हणवून घेतो.  त्यामधूनच पुढचा सर्व संसार प्रारंभ होतो.

 

जीवाच्या बुद्धीवर माया आवरण घालते.  रोज नवी नवी प्रलोभने निर्माण होतात.  मनुष्य त्यास बळी पडतो.  कनक-कांचन-कामिनी यामध्येच अडकतो.  रात्रंदिवस त्याला विषयांचाच ध्यास लागतो.  पैसा, स्त्रीभोग, प्रॉपर्टी, धंदा याशिवाय त्याला काहीही सुचत नाही.  विषयभोग भोगण्यामध्ये आयुष्य कसे निघून गेले, हेही त्याला समजत नाही.  मृत्यु झाल्यानंतर पुन्हा पुढचा जन्म, पुन्हा मृत्यु असे अव्याहत चक्र चालू राहते.  त्यामध्येच मनुष्य बद्ध होतो.

 

बहिरंगाने मनुष्याने जीवनाचा कितीही विकास केला, प्रगति केली किंवा ऐहिक समृद्धि, ऐश्वर्य, भरभराट केली, चार-दोन बंगले बांधले, अनेक ठिकाणी प्रॉपर्टीज निर्माण केल्या, स्वीस बँकांमधून पैसे साठवून ठेवले तरी त्यावर मानवी जीवनाची यशस्विता ठरत नाही.  इतकेच नव्हे तर बाह्य विषयांचे कितीही ज्ञान घेतले, अनेक पदव्या संपादन केल्या, संगीत-कला-नृत्य आदि अनेक क्षेत्रांचे ज्ञान घेतले तरी जोपर्यंत मनुष्याला स्वस्वरूपाचे ज्ञान होत नाही, तोपर्यंत त्याच्या जीवनाला परिपूर्णता येऊ शकत नाही.  हे त्रिवार सत्य आहे.

 

म्हणूनच श्रुति येथे सांगते की – या मनुष्यजन्मामध्ये जिवंत असताना मनुष्याने आत्मस्वरुपाला जाणले तर त्याच्या जीवनात काही अर्थ किंवा तथ्य आहे.  म्हणजे त्याचे जीवन सफल आहे.  अन्यथा सर्व प्राणिमात्रांच्यामध्ये अत्यंत दुर्लभ असणारे मनुष्यशरीर प्राप्त होऊनही जर मनुष्याने आत्मस्वरूपाला जाणले नाही तर त्याचे जीवन व्यर्थ, निष्फळ आहे.  त्याचा तो महान नाश आहे.

 

 

- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "
Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013



- हरी ॐ



Tuesday, May 13, 2025

योगी पुरुषाची अंतरंगाची अवस्था | Internal State Of A Yogi

 



योगी पुरुष हा व्यवहार करूनही सुषुप्तीप्रमाणे शांत असतो.  कारण सर्व दृश्यरूपी आभास जेथून उत्पन्न होतात, अशा आभासरहित ब्रह्मामध्ये तो स्थित असतो.  योगी पुरुष बहिरंगाने शरीर, इंद्रियादि उपाधींच्या साहाय्याने सर्व प्रकारचे व्यवहार करीत असतो.  परंतु त्याची बुद्धि मात्र एकाद्या झोपलेल्या मनुष्याप्रमाणे अत्यंत शांत असते.

 

ज्याला शांत झोप लागली आहे, अशा मनुष्यांच्या जागृत व स्वप्नामधील व्यवहार पूर्णतः थांबलेला असतो.  गाढ झोपलेल्या मनुष्याला कोणतेही विकार सतावत नाहीत.  त्याला बाह्य विषयांचे भान राहत नाही.  कामक्रोधादींचा प्रभाव क्षीण होतो. झोपल्यावर अहंकार आणि ममकारही राहत नाही.  बाह्य विषयांची तसेच स्वतःच्या शरीराची सुद्धा जाणीव संपते.

 

अशा या सुप्त मनुष्याप्रमाणेच ज्ञानी पुरुषांची अंतरंगाची अवस्था असते.  त्यामुळे ज्ञानी पुरुष बाहेरून व्यवहार करीत असेल तरी त्याची बुद्धि मात्र अतिशय शांत व निर्विकार असते.  याचे कारण त्याचे मन ब्रह्मस्वरूपामध्ये स्थित असते.  खरे तर ब्रह्मस्वरूपामधूनच सर्व आभास म्हणजे सर्व दृश्य, समष्टि विश्व आणि व्यष्टि जीव उत्पन्न होतात.  परंतु तरीही ब्रह्मस्वरूप मात्र निराभास म्हणजे आभासरहित, विकाररहित असते.  दृश्य जगताचा कोणताही परिणाम ब्रह्मस्वरूपावर होत नाही.  अशा या निर्विकार चैतन्यामध्ये ज्ञानी पुरुष नित्यनिरंतर स्थिर झाल्यामुळे बहिरंगाने सर्व क्रिया करूनही तो निष्क्रिय, निर्विकार, अलिप्त व अस्पर्शित राहतो.  हाच येथे अभिप्राय आहे. 

 

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ




Tuesday, May 6, 2025

मैत्रः | Spirit Of Friendship

 




सर्वेषां भूतानां मित्रवदनुकूलतया वर्तत इति मैत्रः स्वात्मभूतेषु भूतेषु सर्वत्र मित्रवद्वर्तनं विदुषो युक्तम् |

मैत्रः’ म्हणजे मैत्रीचा भाव.  जो सर्व भूतमात्रांच्याबरोबर मैत्रीच्या नात्याने, अनुकूलतेने व्यवहार करतो त्याला ‘मित्र’ असे म्हणतात.  ब्रह्मज्ञानी पुरुष सर्वांचा मित्र होतो.  त्याच्या मनामध्ये सर्व भूतमात्रांविषयी जिव्हाळा, प्रेम, आपुलकी, स्नेह निर्माण होतो.  तो सर्वांनाच पूर्णपणे सामावून घेतो.

 

एखाद्या मनुष्याचे सद्गुण मान्य करणे फार सोपे आहे; परंतु त्याचे दोष, दुर्गुण, आपल्याला अनुकूल नसलेले त्याचे व्यक्तिमत्व मान्य करणे फार अवघड आहे.  एकदा एखाद्याला मित्र म्हटले की, आपण त्याला गुणदोषासहित मान्य करतो.  तो कसा ही वागू देत, चिडू देत, रागावू देत, परंतु मी मात्र त्याच्याशी जशास तसे वागत नाही, कारण त्याला मी माझा मित्र मानलेले असते.  माझे आचरण या मैत्रीला अनुकूल असेच असते.  मी त्याला कधीही दुःख न देता प्रेम, सुख देतो.  त्याचप्रमाणे हा ब्रह्मज्ञानी पुरुष तर सर्वच भूतमात्रांचा मित्र, जगन्मित्र, विश्वमित्र होतो.

 

लहान, तरुण, प्रौढ, वृद्ध कोणीही असो, तो या सर्वांशी अत्यंत आपुलकीने, प्रेमाने वर्तन करतो.  लहानात लहान होऊन खेळतो, तरुणांच्यामध्ये त्यांच्या गप्पागोष्टींमध्ये रस घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करतो, प्रौढांच्यामध्ये प्रौढ होतो तर वृद्धांच्या सुखदुःखांशी समरस होऊन त्यांना दिलासा देतो.  या प्रेमाला वय, धर्म, जाति, स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत असे कोणतेही बंधन अथवा मर्यादा नसतात.  तसेच हे प्रेम निष्काम, निरपेक्ष, निःस्वार्थ असते. यामुळेच त्याचे प्रेम रागद्वेषरहित, शुद्ध, अमर्यादित असते.  म्हणून असा हा पुरुष सर्वांनाच हवाहवासा वाटतो.  त्याचे मन अत्यंत शुद्ध, सात्त्विक, गंगाजळाप्रमाणे निर्मळ, निरागस झाल्यामुळे तो सर्वांच्यावर निर्व्याज प्रेम करू शकतो.

 

व्यवहारामधील प्रेम हे स्वार्थापोटी केलेले, सकाम, रागद्वेषयुक्त, कलुषित असते.  त्यामुळे ते वर-वर चांगले वाटले तरी शेवटी दुःखालाच कारण होते.  थोड्याशा सहवासाने त्या व्यक्तिविषयी मनामध्ये तिटकारा, द्वेष निर्माण होतो.  याउलट जो शुद्धात्मा, ब्रह्मज्ञानी पुरुष आहे त्याच्या सान्निध्यात, सहवासात जो जो कोणी येईल त्या सर्वांनाच शुद्ध प्रेमाचा अनुभव येतो, कारण ब्रह्मज्ञानी पुरुष हा स्वतःच प्रेमस्वरूप, आनंदस्वरूप आहे.  त्यामुळे दुसऱ्याकडून कशाचीही यत्किंचितही अपेक्षा, इच्छा नसते.  हा आनंद क्षणाक्षणाला वर्धन पावतो, उत्कार्षित होतो.  हा आनंद सर्वांना देत असल्यामुळेच ब्रह्मज्ञानी पुरुष सर्व भूतमात्रांचा, विश्वाचा मित्र होतो.


 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ