Tuesday, March 25, 2025

परिसाचा संग | Transformational Company

 



गुरूंचा महिमा, गुरूंचे माहात्म्य, अगाध, अपार, अनाकलनीय आहे.  सर्व शास्त्र, पुराणे, आचार्य त्यांचा महिमा गातात.  सद्गुरू शरण आलेल्या शिष्याला घडवीत असतो.  ते जीवनाला निश्चित दिशा देतात.  त्यांच्याच कृपेमुळे आपण जीवनात निश्चित काय शोधत आहोत, आपले अंतिम साध्य काय आहे ते समजते.  त्यांच्याच कृपेमुळे आपल्या जीवनात आत्मविश्वास, श्रद्धा, निष्ठा, धैर्य, निःस्वार्थ सेवा, त्याग भक्ति वगैरे वृत्तींचा उत्कर्ष होतो.  आपले मन विषयांच्यापासून निवृत्त होऊन हळूहळू ईश्वराभिमुख होते.  अंतर्मुख होते.  प्रत्येक कर्मामधून ईश्वराची, गुरूंची सेवा घडते.  त्यांच्याच संगाने आमच्या मनातील राग-द्वेष, कामक्रोधादि विकार कमी होतात.  चित्त शुद्ध, निर्मळ होते.  आमच्या साधनेमध्ये सातत्य, नियमितपणा येतो.

 

सद्गुरूंच्याच कृपेमुळे जीवनात येणाऱ्या सर्व संकटांच्यामधून, अडचणींच्यामधून, आपत्तीमधून साधक पार होतो.  बाह्य प्रसंग मन विचलित करीत नाहीत.  सर्व बाह्य विषयांची, व्यवहाराची निष्फळता समजावयास लागते आणि ईश्वरविषयीचे प्रेम, ओढ वाढते.  परमेश्वराचे चिंतन अखंड होते आणि शेवटी त्यांच्याच उपदेशाने अंतरंगामध्ये असलेला अज्ञानाचा अंधार नाहीसा होऊन आत्मप्रचीति येते.  जीवनामध्ये परमोच्च आनंदाची अनुभूति येते.  जीवन पूर्ण होते.  तृप्त होते.

 

म्हणून सद्गुरुंचे सान्निध्य आणि त्यांची कृपा ही परीसापेक्षाही अधिक आहे.  परीस फक्त लोखंडाचे सोने करतो परंतु त्याला लोखंडाचे सोने करण्याचे सामर्थ्य देत नाही.  सद्गुरू मात्र शिष्याला स्वतःचे आत्मस्वरूप देऊन सद्गुरू बनवितात.  खरोखर त्यांची किमया अगाध आहे.  अपार आहे.  म्हणूनच सर्व संत म्हणतात.  आम्ही बी घडलो ।  तुम्ही बी घडाना ।  नारदमहर्षि म्हणतात ते त्रिवार सत्य आहे.  महत्सङ्गःस्तु दुर्लभोऽग्यम्योऽमोघश्च |

 

थोडक्यात महात्म्यांच्या संग अत्यंत दुर्लभ, अगम्य आणि अमोघ आहे.  त्यांच्या कृपेनेच परमप्रेमरूपा, अमृतस्वरूपा न कामयमाना भक्ति आपण प्राप्त करू शकतो.  म्हणून तप, यज्ञ, याग, पूजा, अर्चना करून घरादाराचा त्याग करून सुद्धा जी भक्ति आपण प्राप्त करू शकत नाही ती भक्ति गुरुकृपेमुळे, संतकृपेमुळे मिळते.  महात्म्यांच्या चरणरजांच्या अभिषेकाने, त्यामध्ये लोळल्याने, त्यांच्या पवित्र स्पर्शाने आपल्या हृदयात ईश्वराचे प्रेम उदयाला येते.  यासाठी महात्म्यांच्या संग, त्यांची कृपा मिळविण्यासाठी प्रयत्न करावा.  बाकी काहीही करू नये, कारण भक्ति स्वतःच्या प्रयत्नाने मिळत नाही.

 


- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006



- हरी ॐ




Monday, March 17, 2025

शून्यवादाचे खंडन | Disproving Nihilism

 



येथे श्रीवसिष्ठ मुनींनी खांबाचा दृष्टांत दिला आहे.  या श्लोकामधून शून्यवादाचे खंडन केले आहे.  दृश्य विश्वाचा प्रलय झाला की, काहीच शिल्लक राहत नाही.  म्हणजे शून्य शिल्लक राहते, असे काही लोक म्हणतात.  परंतु असे म्हणणे युक्तिसंगत नाही.  हे सिद्ध करण्यासाठीच येथे खांबाचा दृष्टांत दिला आहे.  

 

"हे रामा !  जसे एखादा कुशल कारागीर एका लाकडी खांबामध्ये चित्र कोरण्यापूर्वी तो ते चित्र त्या खांबामध्ये प्रथम कल्पनेने पाहतो.  चित्र त्या खांबामध्ये असतेच.  त्याचप्रमाणे रामा !  विश्व निर्माण होण्यापूर्वी सुद्धा ते विश्व त्याच्या करणामध्येच अस्तित्वात असतेच.  म्हणून रामा !  विश्वाचे कारण असणारे परमात्मतत्त्व सत् स्वरूपाने अस्तित्वामध्ये असते.  ते तत्त्व निश्चित शून्य नसून सत् तत्त्व आहे, हेच येथे सिद्ध होते."

 

जसे आपण अनेक वेळेला सोने आणि अलंकार हे विधान ऐकतो.  त्यामध्ये आपण म्हणतो की, नाम-रूपाचा म्हणजेच अलंकारांचा नाश होतो, पण सोन्याचा मात्र कधीही नाश होत नाही.  या दृष्टांतामध्ये आणखी सखोल विचार केला तर समजते की, वस्तुतः अलंकारांचा सुद्धा नाश होत नाही.  अलंकार निर्माण होतात सोन्यामधून, सोन्यामध्ये अस्तित्वात असतात आणि नाश झाल्यानंतर सोन्यामध्येच जातात.  म्हणजेच नाश झाल्यानंतर अलंकार हे सोन्यामध्येच अस्तित्वात आहेत.  म्हणजेच सोनेही आहे आणि त्यामध्ये अलंकारही आहेत.

 

याचा अर्थच कारणही आहे आणि कार्यही आहे.  फक्त लय पावल्यानंतर आपल्याला नामरूपात्मक अलंकार दिसत नाहीत.  पण म्हणून अलंकार नाहीत, असे सिद्ध होत नाही.  म्हणजेच सोनेही आहे आणि अलंकारही आहेत.  याप्रमाणे येथे शून्यवादाचे पूर्ण खंडन होते.  म्हणून श्रीवसिष्ठ मुनि येथे म्हणतात - तथा विश्वं स्थितं तत्र तेन शून्यं न तत्पदम् |  विश्वाचा प्रलय झाल्यानंतर सुद्धा विश्व त्याच्या करणामध्ये स्थित असते.  म्हणून ते पद म्हणजेच विश्वाचे कारण कधीही शून्य होऊ शकत नाही.

 

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ




Tuesday, March 11, 2025

कर्मफलत्याग साधना कोणाला ? | “Result-Sacrifice” Meant For Whom?

 



कर्म अथवा कर्मफळ हे कधीही मोक्षाचे साधन होऊच शकत नाही.  कर्म आणि कर्मफळ हे दोन्हीही अज्ञानामधून निर्माण झालेले आहेत.  कर्म व कर्मफळ अज्ञानाच्या विरोधी नसल्यामुळे अज्ञानाचा नाश करू शकत नाही.  यावरून सिद्ध होते की, कर्म व कर्मफळ मोक्षप्राप्तीचे साधन होऊच शकत नाही.  फक्त ज्ञानानेच अज्ञानाचा व अज्ञाननिर्मित कार्याचा ध्वंस होऊ शकतो.  म्हणून ज्ञान हेच मोक्षसाधन आहे.  हाच सर्व श्रुतींचा, शास्त्राचा, गीतेचा सिद्धांत आहे.  हे त्रिवार सत्य आहे.

 

परंतु तरीही भगवान येथे अज्ञानी, कामुक पुरुष डोळ्यासमोर ठेऊन त्याची साधनेमध्ये प्रवृत्ति होण्यासाठी कर्मफलत्यागाची स्तुति करतात.  याठिकाणी हा उपदेश ज्ञानी पुरुषाला दिलेला नाही.  ज्ञानी पुरुष हा direct श्रवणादि साधना करून – (मामेव प्राप्नुवन्ति |)  माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो.  ज्ञानी त्वात्मैव मे मतम् |  ‘ज्ञानी’ आणि ‘मी’ यांच्यामध्ये द्वैतभाव राहातच नाही.  त्यामुळे ज्ञानी पुरुषाला उपदेशाची आवश्यकताच नाही.

 

परंतु जे मंद-मध्यम अधिकारी आहेत.  ज्यांचे मन अजूनही अशुद्ध, अपरिपक्व आहे, त्यांचाही उद्धार करण्याची भगवंतांची तळमळ आहे.  ते सर्व श्रद्धावान आहेत.  परंतु मनामध्ये असणाऱ्या दोषांच्यामुळे ते माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत.  त्यामुळेच ते व्याकूळ झालेले आहेत.  अत्यंत दुःखी-कष्टी आहेत.  या भावसागरामध्ये पूर्णपणे बुडाल्यामुळे ते अत्यंत घाबरलेले, हीन-दीन, अगतिक, असहाय्य झालेले आहेत.  ते दुःखाने आकांत, आक्रोश करीत आहेत.  पाहि मां, त्राहि मां |  असा टाहो फोडीत आहेत.  त्यांना स्वतःला या भावसागरामधून तरून जाण्याचे सामर्थ्य नाही.

 

अशा या भक्तांच्यावर परमकृपाळु, दयेचा सागर, करुणार्णव, करुणानिधि, भक्तपालक, भक्तरक्षक असणारे भगवान कृपाकटाक्ष टाकतात आणि म्हणताततेषामहं समुद्धर्ता |  अशा भक्तांना भगवान दिलासा देतात, अभयदान देतात आणि सुलभ-सोप्या साधना सांगून त्यांना त्यामध्ये प्रवृत्त करतात.  बाळाS, तुला काहीच जमले नाही तरी हरकत नाही.  तू निराश होऊ नकोस.  तू फक्त कर्मफलत्याग करण्याचा अभ्यास कर.  हीच तुझी साधना आहे.  यामध्ये तू निष्ठा प्राप्त केलीस की, मग पुढची साधना पाहू.  याप्रमाणे त्याच्या कलाने घेऊन त्याला झेपेल अशा साधना देतात.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ




Tuesday, March 4, 2025

साधूंचे दर्शन | Effects Of Meeting A Sage

 




आपल्या गुरूंचे दर्शन घेणे म्हणजे हजारो ज्ञानी पुरुषांचे दर्शन घेण्याप्रमाणे आहे.  एक साधु हा लाख लोकांइतका सामर्थ्यशाली असतो.  साधूंच्या संगामध्ये - मृतिः अपि उत्सवायते |  म्हणजे मृत्युसारखा प्रसंग सुद्धा एखाद्या उत्सवासारखा वाटतो.  एखाद्या ठिकाणी कोणाचा मृत्यु झाला आणि तेथे ज्ञानी पुरुष गेला, तर ज्ञानी पुरुषाच्या आगमनाने त्याच्या दर्शनाने मृत्यूच्या भयंकर प्रसंगामध्येही अज्ञानी जीवांचे मन शांत होते.  उद्वेग कमी होतो. साधूंचे पुण्यकारक दर्शन झाल्यामुळे त्यांच्या मनाला आधार मिळतो.  मृत्यूसारख्या प्रसंगामध्ये सुद्धा उत्सव निर्माण करण्याचे सामर्थ्य या ज्ञानी पुरुषामध्ये असते.

 

सर्वसाधारणपणे जेथे मृत्यु होतो तेथे सर्व माणसे दुःखी होऊन भकास चेहऱ्याने बसलेली असतात.  परंतु ज्ञानी पुरुषाच्या जाण्याने मात्र तेथिल वातावरण बदलते.  सर्वांना त्या प्रसंगामध्ये ईश्वराचे स्मरण होते आणि मृत्यूला सुद्धा उत्सवाचे स्वरूप येते.

 

त्याचप्रमाणे आपल्यावर एखादे मोठे संकट कोसळले आणि त्यावेळी जर साधूंचे दर्शन झाले तर त्या संकटाचा प्रभाव एकदम कमी होतो - आपत् सम्पत् इव आभाति |  त्यावेळी विपत्ति सुद्धा संपत्तीप्रमाणे वाटते.  म्हणजे संकटकाळी महात्म्यांचे दर्शन झाले तर आपण ते संकट क्षणभर विसरून जातो आणि अचानक एखाद्याला धनाचा साठा मिळावा, तसा आनंद साधूंच्या दर्शनाने होतो.  म्हणून साधूंचे दर्शन हे अत्यंत दुर्लभ आहे.  रोज रोज दर्शन मिळाले तर त्याची किंमत कळत नाही.  मात्र मृत्यूच्या समयी संकटकाळी सत्पुरुषांच्या दर्शनाचे महत्त्व समजते.  असा हा सत्संग अतिशय दुर्लभ व श्रेष्ठ आहे.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ