Sunday, May 24, 2015

श्री दक्षिणामूर्ति | Shree Dakshinamurty


श्री दक्षिणामूर्ति हे श्रुतिसागर आश्रमाचे आराध्य दैवत !  श्री दक्षिणामूर्ति म्हणजेच गुरुस्वरूपामधील शंकराचा अवतार होय.  दक्षिणा म्हणजेच सुंदर होय.  गुरुस्वरूपामधील शंकराची ही मूर्ति अत्यंत सुंदर असल्यामुळे हिला ‘श्रीदक्षिणामूर्ति’ असे म्हणतात.

किंवा या मूर्तीचे मुख दक्षिणेकडे असल्यामुळेही हिला ‘श्रीदक्षिणामूर्ति’ असे म्हणतात.  दक्षिण दिशा ही मृत्यूची, अज्ञानाची दिशा आहे.  साहजिकच दक्षिणामूर्तीकडे जे शिष्य, साधक येतील त्यांचे मुख उत्तरेकडे होते.  म्हणजेच श्रीदक्षिणामूर्ति शरण येणाऱ्या आपल्या शिष्यांच्या अंतःकरणामधील आत्मअज्ञानाचा ध्वंस करून त्यांना आत्मज्ञान प्रदान करतात आणि जन्ममृत्युरूपी संसारामधून मुक्त करतात.

श्रीदक्षिणामूर्तीचे मौन हेच व्याख्यान आहे.  मौन म्हणजेच शांतस्वरूप होय.  ते स्वतःच मौनस्वरूप असून मौनस्वरूप आत्म्याचा उपदेश शिष्यांना देतात व शिष्य सुद्धा स्वतःच मौनस्वरूप, शांतस्वरूप, परब्रह्मस्वरूप होतात.

श्रीदक्षिणामूर्तीस चार हात असून त्यामध्ये चार मुद्रा धारण केलेल्या आहेत.  वरील उजव्या हातातील रुद्राक्षमाळेच्या साहाय्याने प्रत्येक साधकाने ‘जपसाधना’ करावी हे सूचित केलेले आहे.  वरील डाव्या हातातील सर्प जीवाच्या अंतःकरणामधील भोगवासनांचे प्रतीक असून साधकाने कामना हळुहळू कमी कराव्यात हे सूचित केलेले आहे.  खालील डाव्या हातातील योगदंड योगसाधना, ध्यान वगैरेदि अंतरंग साधना करावी हे सुचवितो.  तर खालील उजवा हात ज्ञानमुद्रेमध्ये असून त्यामधून जीवब्रह्म्यैक ज्ञान प्रतिपादित केलेले आहे.

श्रीदक्षिणामूर्तीच्या चरणाखाली जन्ममृत्यूयुक्त संसाररुपी सर्पाच्या विळख्यामध्ये बद्ध असणारा जीव म्हणजेच अहंकार होय.  श्रीदक्षिणामूर्ति आपल्या शिष्यांच्या अहंकाराचा पूर्णपणे नाश करतात, हे यामधून सूचित केलेले आहे.  श्रुतिसागर आश्रमामध्ये अत्यंत दुर्मिळ अशी श्रीज्ञानदक्षिणामूर्ति सर्व शिष्यांना अखंडपणे आत्मज्ञान प्रदान करीत विराजमान झालेली आहे.

- "सत्संग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति, २००१
- Reference: "
Satsang" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 4th Edition, 2001




- हरी ॐ

Tuesday, May 19, 2015

चांगले उद्दिष्ट, गैर मार्ग | Good Intention, Bad Action


चांगले उद्दिष्ट साधावयाचे आहे व ते साधण्यासाठी प्रसंगी गैरमार्गाचा अवलंब करावा लागणार असेल तर ते चांगले उद्दिष्ट साधावे की नाही ?

चांगल्या उद्दिष्टासाठी गैरमार्गाचा अवलंब शक्यतो टाळावा.  आपले साधन साध्यानुसार असावयास हवे.  केवळ उद्दिष्ट चांगले आहे एवढयावरून आपल्याला मिळणारे त्याचे फळ चांगलेच असेल असे नाही.  काही प्रमाणात ते सदोष होणार.  एखादा मनुष्य श्रीमंत सत्ताधाऱ्यांकडून गांजला गेला आहे, लुबाडला गेला आहे, त्याच्याप्रमाणेच इतर काही जणांचे संसार त्या श्रीमंत सत्ताधाऱ्याने उध्वस्त केले आहेत, अशा वेळी सूडाच्या भावनेने पेटलेला तो मनुष्य त्या श्रीमंताच्या घरावर दरोडा घालतो आणि मिळालेला पैसा रंजल्या गांजल्यांसाठी उपयोगात आणतो.

त्याच्या या वृत्तीचे उद्दिष्ट चांगले आहे.  म्हणून त्याचे फळही काही प्रमाणात चांगले मिळेल.  पण त्यामुळे त्याची ही कृति निर्दोष ठरत नाही.  तो कोर्टात गेला तरी दरोड्यामागचा त्याचा उद्देश चांगले म्हणून त्याची निर्दोष सुटका होत नाही.  मात्र त्याला मिळणारी शिक्षा काही प्रमाणात सौम्य होण्याची शक्यता असते.  चांगल्या उद्देशाने केलेल्या कर्मामुळे त्यातील दोषांची तीव्रता कमी होते.  म्हणून चांगले उद्दिष्ट टाळू नये.


- "सत्संग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति, २००१
- Reference: "
Satsang" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 4th Edition, 2001




- हरी ॐ

Tuesday, May 12, 2015

गुरुप्राप्तीपूर्वीच्या प्रवासाचे फलित | Effect of Pre-Initiation Journey


नाममंत्र देणारा किंवा मंत्रदीक्षा देणारा एखादा गुरु न मिळाल्यामुळे जर एखादा साधक आपल्या बुद्धीनुसार आपल्या इष्टदेवतेच्या नावाचा जप करीत राहिला किंवा एखाद्या मंत्राचा जप करीत राहिला तर त्याचा तो जप वाया जाणार नाही.  जोपर्यंत साधकाला गुरुप्राप्ति होत नाही तोपर्यंत साधक श्रद्धेने ईश्वराची पूजा-अर्चना करीत असतो.  त्याच्या नामाचा जप करतो.  या अवस्थेत गुरुप्राप्तीपूर्वी ईश्वर हाच त्याचा गुरु असतो.

तुम्ही पूजा-अर्चा करून ईश्वरोपासना करा, नामसंकीर्तनाने करा किंवा मंत्राचा जप करून करा, ती श्रद्धेने आणि सातत्याने केली असेल तर साधकाची निष्ठा किंवा श्रद्धा दृढ होत जाते.  त्या दृढ श्रद्धेमुळे एक वेळ अशी येते की, ईश्वर आपणाला आध्यात्मिक प्रेरणा देणारा एखादा गुरु उपलब्ध करून देतो.

म्हणजेच सश्रद्ध साधकाला योगायोगाने कोणी न कोणी गुरु लाभतोच.  अशा वेळी ‘इष्ट देवतेच्या उपासनेने गुरुप्राप्ति झाली’ असे तो साधक मानू लागतो.  गुरुप्राप्ति ही त्या साधकाच्या इष्टदेवतेच्या उपासनेचेच फळ होय.  एकदा गुरुप्राप्ति झाली की, साधकाच्या मनोवृत्तीतही बदल होतो.  ‘गुरु हाच आपला ईश्वर’ अशी त्याची श्रद्धा होते.  प्रथम ईश्वर हाच त्याचा गुरु असतो.  गुरुप्राप्तीनंतर गुरु हा त्याचा ईश्वर बनतो.

‘यस्य देवे पराभक्तिर्यथा देवे तथा गुरौ |  तस्यैते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः |’  गुरूंच्या ठिकाणी त्याला सगुण-साकार ईश्वरच दिसू लागतो.  अशा गुरूंकडून त्याला मंत्रदीक्षा मिळते.  त्या मंत्राच्या जपाने साधक क्रमाक्रमाने आत्मोन्नतीकडे वाटचाल करू लागतो.  मंत्रोपासनेने साधकाची निष्ठा दृढ होत जाते.  गुरुकृपेने त्याची साधनेच्या मार्गावर प्रगति होत जाते.  म्हणून गुरुप्राप्तीपूर्वी साधक जे जे करतो ते निष्फळ ठरत नाही.


- "सत्संग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति, २००१
- Reference: "
Satsang" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 4th Edition, 2001





- हरी ॐ

Friday, May 1, 2015

आस्तिक आणि नास्तिक | Believer and Non-Believer


सामान्यतः व्यवहारात ईश्वराचे अस्तित्व मानणारा तो आस्तिक आणि ईश्वराचे अस्तित्व न मानणारा तो नास्तिक असा समज आहे.  पण फक्त ईश्वर आहे किंवा नाही यावर श्रद्धेचा निकष होत नाही.  

जगात धर्म-अधर्म, न्याय-अन्याय, चांगले-वाईट असे काहीच नाही.  विश्वाचा कोणी निर्माता नाही.  थोडक्यात जीवनमूल्ये नाहीत, असे समजून स्वार्थी वृत्तीने ‘यावत् जीवं सुखं जीवेत् णं कृत्वा घृतं पिबेत् |’  म्हणजे ‘जीव असेपर्यंत सुखाने जगावे.  ऋण काढून सुद्धा तूप प्यावे’ या वृत्तीने जीवन जगणारा, ‘खाओ, पीओ, मजा करो’ अशी भूमिका असलेला तो नास्तिक.  आपण आणि आपल्यासमोरील जग, त्यातील सुखोपभोग एवढाच विचार करून विषयोपभोगाने जास्तीत जास्त सुख मिळवू पाहाणारा तो नास्तिक.  त्याला स्वैर, स्वच्छंद वर्तनाची, अनाचाराची चाड नसते.

याउलट, जीवनमूल्यांवर श्रद्धा ठेऊन सद्गुणांची जोपासना करीत सारासार विचाराने संयमित व शिस्तबद्ध जीवन जगणारा जो असतो तो आस्तिक.  मग तो ईश्वराचे अस्तित्व मानीत नसेल तरी तो आस्तिकच, कारण जीवनात न्याय-अन्याय, धर्म-अधर्म, योग्य-अयोग्य, नीति-अनीति असे काही आहे, जीवनमूल्ये आहेत, अशी त्याची श्रद्धा असते. ‘अस्ति इति बुद्धिः यस्य सः आस्तिकः |’ या न्यायाने निरीश्वरवादी पण जीवनमूल्ये जपणारा आस्तिक ठरतो.  ईश्वरावर श्रद्धा नसलेला मनुष्य पूजा-अर्चा, जपजाप्य, व्रत-वैकल्ये करणार नाही; पण आचार-विचार-उच्चार या बाबतीत तो शुद्ध असेल तर तो विवेक-वैराग्य-शमदमादि साधनसंपत्तीने युक्त होईल.

मनुष्याची स्वाभाविक ओढ अंतिम सुखाकडे (Absolute Happiness) असते.  सुखाची गुरुकिल्ली म्हणजे जीवनावर, जीवनमूल्यांच्यावर निष्ठा.  ईश्वरावर निष्ठा नसलेला, जपजाप्य, पूजा-अर्चा, व्रत-वैकल्ये करीत नसला, तरी दैवी गुण बाणविण्याचे प्रयत्न करीत तो निर्मळ जीवन जगत, आचार-विचार-उच्चार शुद्ध ठेवीत असेल तरी तोही आत्मानुभूतीच्या पायरीपर्यंत पोहोचला आहे असे समजायला हरकत नाही.


- "सत्संग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति, २००१
- Reference: "
Satsang" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 4th Edition, 2001



- हरी ॐ