Tuesday, January 28, 2014

खरा आनंद म्हणजे काय ? | What is Real Bliss?




जोपर्यंत प्रिय विषयाची वृत्ति आहे तोपर्यंत आनंद आहे, आणि विषयवृत्ति संपली की हा आनंदही संपतो.  व्यावहारिक आनंद म्हणजे प्रिय विषयाच्या सान्निध्याने निर्माण झालेल्या विशेष वृत्तीमध्ये पडलेले आनंदस्वरूप आत्म्याचे प्रतिबिंब आहे.  हा शुद्ध आनंदाचा एक भास आहे.

याउलट आत्मसुख हे निस्तरंग सहज आनंदस्वरूप आहे.  हा आनंद इंद्रिये व विषय यांच्या संयोगामधून निर्माण होत नसल्यामुळे तो सोपाधिक, वैषयिक नाही.  तर तो सहजस्वाभाविक स्वस्वरूपाचा आनंद आहे.  हा परिपूर्ण आनंद कशातही अंतर्भूत नाही.  तसेच तो अथांग, अंतर्बाह्य परिपूर्ण आहे.

अन्तःपूर्णः बहिःपूर्णः पूर्णकुम्भ इवार्णवे |
अन्तःशून्यः बहिःशून्यः शून्यकुम्भ इवाम्बरे ||

ज्याप्रमाणे समुद्रामध्ये बुडविलेला कुंभ आतून बाहेरून सर्व बाजूंनी पाण्याने परिपूर्ण असतो, किंवा रिकामा केलेला घट आकाशामध्ये आतून बाहेरून सर्व बाजूंनी रिकामा असतो.  त्याप्रमाणे या आनंदसागरात रममाण होणारा ब्रह्मज्ञानी अंतर्बाह्य परिपूर्ण असतो.

मोठा जलाशयच मिळाल्यानंतर इतर लहान जलाशयांची (आड, विहीर वगैरे) आवश्यकता राहात नाही, त्याचप्रमाणे ब्रह्मानंदाची प्राप्ति झाल्यानंतर त्या विद्वान पुरुषाला आनंदासाठी वेदांचीही आवश्यकता राहात नाही.  हाच आनंद परिपूर्ण करणारा, पूर्ण तृप्ति देणारा, कृतकृत्य करणारा आहे.

या आनंदामध्ये रजोगुण, तमोगुणाबरोबर सत्वगुणही गळून पडतो.  आनंद हे स्वतःचे स्वरूप बनते.  आनंद आणि मी भिन्न न राहाता ‘मी’ स्वतःच आनंदस्वरूप होतो.  तेथे आनंदाची इच्छाही शिल्लक राहात नाही.  तेथे सर्व कामना, इच्छा गळून पडतात.  राहातो तो फक्त निर्भेळ आनंद ! 
 

 
- "मनीषा पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति, २०१२       
- Reference:  "Maneesha Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 4th Edition, 2012



- हरी ॐ

Tuesday, January 21, 2014

योग्याची लक्षणे | Characteristics of a Yogi

 
शुद्ध, निर्मळ, वैराग्यसंपन्न मनाने जो नित्य, निरंतर परमात्मस्वरूपावर अखंड चिंतन करतो त्याला आत्यंतिक आनंदाची प्राप्ति होते.  हेच योगाचे फळ आहे.  आणि हाच खरा योग आहे.  या आनंदाचे वर्णन आचार्यांनी केलेले आहे – तो आनंद उत्कर्ष-अपकर्षरहित, वृद्धी-क्षयरहित, तरतमभावरहित – निस्तरंग सहजस्वाभाविक स्वस्वरूपाचा आनंद आहे.
 
इंद्रियातीत असलेले फक्त शुद्ध आणि सूक्ष्म बुद्धीनेच अनुभवाला येणारे आत्यंतिक सुख जो योगी जाणतो तो परमात्मस्वरूपापासून कधीही विचलित होत नाही.  जे सुख प्राप्त झाले असताना त्याहून अधिक दुसरा कोणताही लाभ मानीत नाही आणि या अवस्थेत स्थित, दृढ झालेला योगी कितीही अति दारुण दुःखाच्या आघाताने विचलित होत नाही.
 
एकदंडी संन्याशासाठी सात प्रकारचे नियम शास्त्रामध्ये दिलेले आहेत.  ही आचारसंहिता आत्मसात करणे हेच दण्डि संन्याशाचे खरे तप आहे.
 
१. मौन
२. योगासन – आसनसिद्धि
३. योगचित्तवृत्तींचा निरोध
४. तितिक्षा – सहनशीलता
५. एकांतवासाची आवड
६. निस्पृहता
७. समत्व
 
मन आणि इंद्रिये यांची एकाग्रता करणे, हेच फार मोठे तप आहे.  अहंकाराचा नाश करून स्वस्वरूपामध्ये स्थिर राहाणे, हेच सर्वात मोठे तप आहे.
 
जो विद्वान पुरुष संपूर्ण वागिंद्रिये व त्यांचे व्यापार तसेच मनाचे सर्व व्यापार नियमित करून अप्रतिबद्ध, अखंडाकार वृत्तीने परब्रह्मस्वरूपाचे अखंड चिंतन करतो, त्याला निरतिशय ब्रह्मानंद प्राप्ति होते.  त्याचे मन निरुद्ध होऊन तो स्वतःच सुखस्वरूप होतो.
 
- "मनीषा पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति, २०१२       
- Reference:  "Maneesha Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 4th Edition, 2012
 
 
- हरी ॐ


Monday, January 13, 2014

योगी म्हणजे कोण ? | Who is a Yogi ?

 
योगाश्चित्तवृत्तिनिरोधः | तद्वान् योगी |  योग म्हणजे सर्व चित्तवृत्तींचा निरोध करणे होय.  चित्तामध्ये कोणतीही वृत्ति उठू न देणे म्हणजेच चित्ताचा निरोध होय.  योगाभ्यासाने ज्याला अशी अवस्था प्राप्त झालेली आहे तो योगी होय.
 
अथवा – योगः अहं ब्रह्मेति ज्ञानम् तद्वान् योगी |
‘ अहं ब्रह्मास्मि | ’ हे ज्ञान म्हणजेच योग होय, कारण हे ज्ञान अज्ञानजन्य द्वैतभावाचा ध्वंस करून जीवाला साक्षात् ब्रह्मस्वरूप करते आणि सर्व संसाराचा उच्छेद करते. असे एकत्वाचे, अद्वय ज्ञान प्राप्त झालेला आहे तो योगी आहे.
 
म्हणून म्हटले आहे – वृत्तिहीनं मनः कृत्वा क्षेत्रज्ञं परमात्मनि |
एकीकृत्य विमुच्यते योगोयं मुख्य उच्यते ||
मन वृत्तिरहित करून क्षेत्रज्ञस्वरूप परमात्म्यामध्ये स्थिर केल्यामुळे मुक्त होणे हाच योगाचा खरा अर्थ आहे.  यामुळे त्याची दृष्टि अमुलाग्र बदलून तो नित्य स्वस्वरूपामध्ये समाधीमध्ये राहातो.
 
श्रुति म्हणते -
यत्र यत्र मनो याति तत्र तत्र समाधयः  |
जेथे जेथे मन जाते तेथे तेथे तो ब्रह्मज्ञानी पुरुष, योगी नित्य समाधि अवस्थेमध्ये असतो.
किंवा –      ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे |
त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे ||
 
भगवान गीतेत योगाची व्याख्या करतात -
तं विद्यादुःखसंयोगवियोगं योगसंज्ञितम्  |  (गीता अ. ६ – २३)
दुःखरूप संसाराच्या संयोगापासून वियोग ह्यालाच योग म्हणतात.  कारण याच अवस्थेत मन सर्व अनात्मस्वरूप विषयांच्या संयोगापासून निवृत्त होऊन आत्मस्वरूपामध्ये अनायासाने स्वस्थ असते आणि तेथेच ते सुखाचा आत्यंतिक अनुभव घेते.
 
 
"मनीषा पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति, २०१२       
- Reference:  "Maneesha Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 4th Edition, 2012
 
 
- हरी ॐ

Tuesday, January 7, 2014

वैषयिक सुख व सहजानंद | Real and Unreal Happiness



वैषयिक सुख हे जेव्हा इंद्रियांचा बाह्य विषयांशी संयोग होतो तेव्हा त्यांच्या उपभोगामधून मिळणारे सुख आहे.  म्हणजेच हे सुख विषय आणि इन्द्रियांच्या सन्निकर्षावर अवलंबून आहे.  परंतु – यत् कृतकम् तत् अनित्यम् | या न्यायाने जे कर्माने किंवा प्रयत्नाने मिळवलेले असते, ते नाश पावते हा लोकप्रसिद्ध अनुभव आहे.

म्हणजेच जोपर्यंत इंद्रिये आणि विषयांचा संयोग आहे, तोपर्यंतच सुख मिळते. संयोग संपला की त्यामधून मिळणाऱ्या सुखाचाही नाश होतो.  म्हणून हे सुख पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे अत्यंत क्षणिक, अनित्य आणि चंचल आहे हे सिद्ध होते.

तसेच वैषयिक सुख जसे अनित्य आहे त्याचप्रमाणे ते तरतमभावयुक्त आहे.  ती सुखाची अनुभूती तीन प्रकारे येते –
 
१. प्रियआपल्याला प्रिय असणाऱ्या विषयाच्या केवळ दर्शनाने जे सुख मिळते, त्या सुखाच्या वृत्तीला ‘प्रिय’ असे म्हणतात.

२. मोद – तीच प्रिय वस्तु जेव्हा आपल्या स्वतःच्या मालकीची होते तेव्हा त्या सुखवृत्तीला ‘मोद’ असे म्हणतात.

३. प्रमोद – जेव्हा प्रिय वस्तूचा प्रत्यक्ष उपभोग होतो त्यामुळे उपभोग घेण्याची वृत्ति पूर्ण होते. अशा सुखवृत्तीला ‘प्रमोद’ असे म्हणतात.

प्रिय, मोद आणि प्रमोद या वृत्ति अंतःकरणामध्ये विशेष गुणवृत्तीने निर्माण होत असल्यामुळे, त्यामधून प्राप्त होणारे सुख साहजिकच तरतमभावयुक्त, सोपाधिक, इंद्रियजन्य आणि क्षणिक आहे.

याउलट सहजानंद हा सहजस्वाभाविक स्वरूपाचा आनंद आहे.  त्यामुळे तो वैषयिक आनंदाप्रमाणे इंद्रियांचा अनुभवण्याचा विषय नसून, इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगावर अवलंबून नाही.  म्हणून त्याला निर्विषयक, निरुपाधिक स्वरूपाचा आनंद असेही म्हणतात.

 
- "मनीषा पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति, २०१२       
- Reference:  "Maneesha Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 4th Edition, 2012



- हरी ॐ